
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. धर्मांतराच्या बद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष दाखवून धर्मांतर करता कामा नये. जर असं होत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून या धर्मांतर विरोधी विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
धाकधपटशा दाखवणं, धमक्या देणं, त्यांच्यानंतर पैसे देतो सांगणं, असं करून कोणी जर धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. मात्र यामध्ये काही प्रश्नांची उत्तर मिळणं गरजेचं आहे. या विधेयकामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरामध्ये वाढ झाली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात आणि देशामध्ये देखील भाजपचीच सत्ता आहे. मग हे सरकार असताना सुद्धा, बळजबरीने किंवा फसवून धर्मांतरामध्ये वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे? असं म्हणत यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला देखील लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसरा प्रश्न म्हणजे कोणत्या समजात? कोणत्या विभागात? कोणत्या प्रकारे धर्मांतर झालं? याचं जर उत्तर मिळालं तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे कार्यकर्ते देखील तिकडे तत्पर राहातील.जर अशा पद्धतीने कोणाचं धर्मांतर होत असेल तर आम्ही देखील त्याला नक्की विरोध करू. आम्ही या बिलाला पाठिंबा देत आहोत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान गॅस टंचाईवरून देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. जर सरकार म्हणतं की राज्यात गॅस टंचाई नाही, तर लोकांनी रागां का लावल्या आहेत, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे.