मराठी येत नसल्याने टाटाच्या व्यवसाय प्रमुखांची प्रताप सरनाईकांसमोरच माफी, म्हणाले मला…
टाटाचे व्यवसाय प्रमुख राजेश कौर यांनी मराठी येत नसल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर माफी मागितली आहे, ते मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

टाटाचे व्यवसाय प्रमुख राजेश कौर यांनी मराठी येत नसल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर माफी मागितली. मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. तर 15 ऑगस्टपर्यंत आमचे मराठीचे वर्ग सुरू आहेत, त्यामध्ये त्यांनी मराठी शिकावं असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये आयोजित या कार्यक्रमात बोलण्यासाठी राजेश कौर उभे राहिले, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मराठी येत नसल्यामुळे माफी मागितली आहे. सर्वात आधी मी माफी मागतो, कारण मी मराठी बोलू शकत नाही, असं या कार्यक्रमात कौर यांनी म्हटलं आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
दरम्यान यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कौर साहेबांनी सांगितलं की, मी मुंबईमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलो आहे, बिझनेस हेड आहे. मला मराठी येत नाही. परंतु मी त्यांना सांगितलं. 15 तारखेपर्यंत मराठीचे वर्ग सुरू आहेत. त्यांना जर मराठी शिकण्याची इच्छा असेल तर ते मराठी शिकू शकतात. खरं तर ते कायद्याच्या कक्षेत नाहीये, कारण मराठी विभाग माझ्याकडे नाहीये, तरी सुद्धा मराठी मंत्री म्हणून, मराठी भाषेवर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून किंवा एका साहित्यिकाचा मुलगा म्हणून, त्यांनी जर मला त्याविषयावर त्यांची भूमिका कळवली तर मी निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल, असं यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.
रिक्षाचालकांना मराठी सक्ती
दरम्यान येत्या 15 ऑगस्टपासून रिक्षाचलकांना मराठी बोलता येणं सक्तीचं आहे. यापूर्वीच सक्ती करण्यात आली होती, परंतु त्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. रिक्षा चालकांना मराठी बोलता यावी यासाठी खास मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. 15 ऑगस्टनंतर रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही, तसेच मुदतवाढ देखील मिळणार नसल्याचं यापूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा कारवाई होण्याची शक्यता आहे.