ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास… विजय वडेट्टीवार म्हणाले, वरून आदेश आहे…
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विमान प्रवासाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करत, भाजपला ठाकरेंची गरज नाही, हे स्पष्ट केले. हा केवळ योगायोग असून, राजकीय समीकरणे बदलणार नाहीत असे ते म्हणाले. जनतेला फोडाफोडीच्या राजकारणाचा कंटाळा आल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल एकत्र विमानाने एकत्र प्रवास केला. दोन्ही नेते योगायोगाने एकाच विमानातून गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा राज्यात नवीन समीकरणे होणार का? या प्रवासात ठाकरे आणि फडणवीस यांची काय चर्चा झाली? अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे. या भेटीचा महाविकास आघाडीवरही काही परिणाम होणार का? अशीही चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा सुरु असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंची भाजपला गरज आहे, असं मला वाटत नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांच्या विमान प्रवासावर भाष्य केलं. हा निव्वळ योगायोग आहे. मेसेज वगैर काही नाही. भाजपला त्यांची कशाला गरज आहे? मला नाही वाटत त्यांना कुणाची गरज आहे. भाजपकडे एवढं मोठं संख्याबळ आहे. 200च्या वर त्यांचं संख्याबळ गेलं आहे. आता नव्या लोकांना कुठे ठेवणार आहे? जागाच नाही. काही तरी फालतूच्या गोष्टी सुरू आहेत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
म्हणून एकत्र प्रवास झाला…
सध्या खासगी विमानं सोडून प्रवास सुरू आहे. मुख्यमंत्री किंवा इतर मोठी मंडळी खासगी विमानाने प्रवास करतात. वरून आदेश आहेत म्हणून डोमेस्टिक विमानाने जात आहे. शनिवारी-रविवारी मुख्यमंत्री नागपूरला असतात. उद्धव ठाकरेंचा दौरा होता. त्यामुळे त्यांचा योगायोगाने एकत्र प्रवास झाला, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
जनता वैतागली
संपूर्ण महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. जनतेत राग आहे. ज्या चिन्हावर निवडून आल्यावर पक्षच सोडायचा तर राजीनामा द्या. कुणालाही जायला मोकळीक आहे. पण एका विचाराने निवडून येता आणि दुसऱ्या ठिकाणी जाता हे चुकीचं आहे. विरोधक संपवण्यासाठी षडयंत्र चाललं आहे. लोकशाही धोक्यात आहे. याच्या वेदना सर्वांनाच आहे. एक सांगतो की, उबाठा पुन्हा नव्याने उभारी घेईल. जनतेचा त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे, ते पाहता असं वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.