Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं
Nitesh Karale Guruji : दिल्लीत काल हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी रस्त्यावर होते. पण विरोधी पक्षाचा एकही बडा नेता दिसला नाही. सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरु असताना तिथे विरोधी पक्षातील नेत्यांची रांग लागली होती.

नितेश कराळे गुरुजी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरुन त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धारेवर धरलं. काल CJP च्या नेतृत्वाखाली दिल्लीत तरुण मुलं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली होती. हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी रस्त्यावर होते. पण विरोधी पक्षाचा एकही बडा नेता दिसला नाही. सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरु असताना तिथे विरोधी पक्षातील नेत्यांची रांग लागली होती. पण काल सीजेपीचं रस्त्यावर आंदोलन सुरु असताना विरोधी पक्षाचे नेते गायब होते. राहुल गांधी का आले नाहीत? आंदोलनात का उतरले नाहीत? या मुद्यावरुन नितेश कराळे गुरुजी यांनी माणिकराव ठाकरेंशी वाद घातला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “विरोधी पक्ष म्हणून तिथे यायला पाहिजे होतं ना. 50-60 खासदार आहेत ना. तीन दिवस झाले. सगळे पक्ष तिथे फोटो सेशन करायला येत होते. एवढ मोठ आंदोलन चालू आहे, राहुल गांधींना समजत नसेल तर सांगा” असं नितेश कराळे गुरुजींनी माणिकराव ठाकरे यांना सुनावलं. माणिकराव ठाकरे त्यांना म्हणाले की, राहुल गांधी फोटो सेशन करत नाहीत. त्यावर कराळे मास्तर म्हणाले की, ‘आंदोलनासाठी कालचा दिवस, आजचा दिवस महत्वाचा होता’ राहुल गांधी का आले नाहीत? हा त्यांचा मुद्दा होता. प्रत्येक शब्दातून ती चीड व्यक्त झाली’
आता मेल्यावर येणार का?
“पोरं आंदोलनाला उपाशी तपाशी बसून आहेत. अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का?. तळपायाची आग मस्तकात जाते. राहुल गांधींनी यायला पाहिजे होतं” हे बोलत असताना कराळे गुरुजींनी माणिकराव ठाकरेंसमोर शिवीगाळ सुद्धा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका माणसाचा मागून आवाज येतो,राहुल गांधी एवढे पायी रॅली काढतात. आता मेल्यावर येणार का? असं तो माणूस म्हणाला. तुमचा रोष भाजपच्या विरोधात पाहिजे, असं माणिकराव ठाकरेंनी म्हटंल, त्यावर रोष भाजपच्याच विरोधात आहे. तुम्ही समोर असते, सभागृह सोडून आले असते तर सत्ता बदलली असती अशा शब्दात कराळे मास्तरांनी संताप व्यक्त केला.