Bhavna Gawli : विदर्भात पावसाचा हाहाकार, अतिवृष्टीग्रस्त विदर्भाला विशेष पॅकेज द्या, भावना गवळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Aug 10, 2022 | 3:36 PM

शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. उसणवारी आणि बँकेचे उंबरठे झिजवून कर्जबाजारी झालेला शेतकरी नैसर्गिक संकटाने डबघाईस आला आहे.

Bhavna Gawli : विदर्भात पावसाचा हाहाकार, अतिवृष्टीग्रस्त विदर्भाला विशेष पॅकेज द्या, भावना गवळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अतिवृष्टीग्रस्त विदर्भाला विशेष पॅकेज द्या, भावना गावळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image Credit source: t v 9
Follow us on

वाशिम : वाशिम-यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान (Heavy loss of agriculture) झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी वाशिम-यवतमाळ (Washim-Yavatmal) लोकसभा मतदार संघाच्या (Lok Sabha Constituency) खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन वाशिम जिल्ह्यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. यवतमाळ जिल्ह्यातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खा. गवळी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी या विशेष पॅकेजची मागणी केली आहे.

अमरावतीतील शेतकऱ्यांची मदतीची मागणी

गेल्या चोवीस तासात अमरावतीत मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळित झालं आहे. यासह खरीप हंगामातील पीकंदेखील पाण्याखाली आलेत. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. उसणवारी आणि बँकेचे उंबरठे झिजवून कर्जबाजारी झालेला शेतकरी नैसर्गिक संकटाने डबघाईस आला आहे. जुलैमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने पुन्हा नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांना संकटात ओढलं आहे. त्यामुळे मायबाप सरकारने सरसकट मदत करून शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

300 हून अधिक घरात पाणी शिरले

अमरावतीत अतिवृष्टीमुळे 300 हून अधिक घरात पाणी शिरलं आहे. जनावरे देखील वाहून गेलीत. यासह पुरामध्ये 6 जण वाहून गेलेत. खरिपातील पिकांसह संत्रा देखील धोक्यात आला आहे. त्यामुळे पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधून किंवा मोबाईल ॲपवरून परिस्थिती दर्शवावी आणि पंचनामे करून घ्यावेत, अशी विनंती जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

भंडाऱ्यात सातही तालुक्यात अतिवृष्टी

भंडाऱ्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे. जिल्ह्यातील 7 ही तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पहायला मिळत आहे. चौफेर नजर फिरविली की रस्त्यावर, शेतात, घरात पाणीच पाणी दिसू लागले आहे. यामुळे जिल्ह्यात 45 गावमार्ग बंद असून, मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जिल्हातील मोहाडी शहरात मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्न, धान्य, गहू संपूर्ण ओले चिंब झाले आहे. वर्षभर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न, धान्य साठवणूक केली जाते. मात्र सततच्या पावसामुळे अनेक लोकांच्या घराचे नुकसान होताना दिसत आहे. पाणी घरात शिरल्यामुळे अन्नधान्याचे सुध्दा नुकसान झाले आहे.