Weather updat : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, काम असेल तरच घराबाहेर पडा, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Weather expert Punjabrao Dakh) यांच्याकडून काही जिल्ह्यांना मोठा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. परंतु गणरायाच्या आगमनासोबतच आता पावसाचं देखील आगमन झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाहीये. या जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात आता पावसाचा जोर वाढणार आहे. 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या काळात राज्यात पाऊस होईल मात्र तो विखुरलेल्या स्वरुपात असेल, मात्र त्यानंतर एक आठवडाभर दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.
काय आहे डख यांचा नवा अंदाज?
14 सप्टेंबर पासून ते 19 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला पाऊस होणार आहे, मात्र तो विखुरलेल्या स्वरुपाचा असेल म्हणजेच काही ठिकाणी पाऊस होईल तर काही ठिकाणी पाऊस होणार नाही. दुपारपर्यंत ऊन पडणार, मात्र सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होईल. मुंबई आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये या काळात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसोबतच पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस होणार आहे. घाटमाथ्यावर देखील पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. परंतु उर्वरीत महाराष्ट्रात मात्र विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल, सर्वदूर पाऊस होणार नाही.
20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत या काळात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे. या काळात नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बिड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, पुणे,अहिल्यानगर, या जिल्ह्यात पुढच्या आठवड्यात मुसळधार पाऊस होणार आहे. वरुणराजा जोरदार बॅटिंग करणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान परतीचा पाऊस राज्यात जोरदार होईल असंही यावेळी पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.