Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या 5 मागण्या कोणत्या? चौथ्या मागणीचं प्रत्येकवेळी आश्वासन पण… आता जरांगे सरकारला सळो की पळो करणार?
Manoj Jarange Patil Key Demands: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. आता या मागण्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या सविस्तर...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 30 मे रोजी ते या उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आज, त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या काही मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. आता या मागण्या कोणत्या आहे? वाचा
काय आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या?
-मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा.
-मराठा समाजाच्या ऐतिहासिक नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील ‘हैदराबाद गॅझेट’चा निर्णय पूर्णपणे अमलात आणा. थांबलेले वाटप पूर्ण करावे, 29 तारखेच्या आत हे पूर्ण करा.
-मराठा बांधवांच्या रक्ताच्या नात्यातील (सगे-सोयरे) आणि विवाहाच्या नोंदी असलेल्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश/GR लागू करा. सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज, संस्थानचा प्रलंबित जीआर 1994 नुसार काढा.
-मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
-आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरीचा जीआर काढा.
आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
30 मे रोजी सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटीमध्ये यायचंच. सगळ्या मराठ्यांनी वाऱ्यासारखे धावून यायचं. शांततेत आंदोलन होणार. मी 3 मे रोजी अंतरवालीत उपोषण करणार. आपली तारीख ठरली. याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.