लता दीदींशी व्हायची तुलना, गोड गळ्याच्या सुमन कल्याणपूर यांची अजरामर गाणी कोणती ?

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतांसोबतच,भक्तीगीते,गझल आणि चित्रपट गीते देखील गायली आहेत. त्यांच्या काळात लता आणि आशा अशा दिग्गज गायिकांचा काळ असूनही त्यांनी त्यांची स्वत:ची प्रतिमा सांभाळत मिळालेल्या गाण्याचे चीज केले.

लता दीदींशी व्हायची तुलना, गोड गळ्याच्या सुमन कल्याणपूर यांची अजरामर गाणी कोणती ?
suman and lata didi
| Updated on: May 31, 2026 | 10:31 PM

ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले आहे. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या आवाजाची सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची तुलना नेहमी केली जायची, इतका त्यांचा आवाज हुबेहुब होता. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सुष्टीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. मुळच्या बंगालच्या असणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म आजच्या बांगलादेशची राजधानी ढाक्का येथील भवानीपूर येथे २८ जानेवारी १९३७ रोजी झाला होता. सुमन हेमाडी त्यांचे माहेरचे नाव होते. लग्नाआधी त्या याच नावाने गात होत्या. रामानंद कल्याणपूर यांच्या विवाहबद्ध झाल्यानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या.

सुमन कल्याणपूर यांनी शास्त्रीय संगीताचा वारसा होता. त्याचे वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले होते. दहा वर्ष विविध गुरूंकडून संगीत शिकत असतानाच अनेक कार्यक्रमांतून त्यांना गायनाची संधी देखील मिळाली. त्यांच्या घरातील वातावरण एकदम कलासक्त असल्यामुळे तिच्या लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते.लहानपणी त्या खूप छान चित्र देखील काढायच्या, पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी चक्क जे.जे.स्कुलमध्ये काही काळ चित्रकलेचेही धडे गिरवले होते.त्यांच्या घरी नाटककार मो. ग. रांगणेकर, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे या कलावंत मंडळीची उठबस असायची.

संगीताच्या शिक्षणाचा श्री गणेशा

सुमन कल्याणपूर यांच्या संगीताच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला तो यशवंत देव यांच्याकडे. देवांनीच तिला पहिल्यांदा चित्रपटकरीता गाण्याची संधी दिली. दुर्देवाने हा सिनेमा कधी आलाच नाही. पण या गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळी हिंदी चित्रपटाचे संगीतकार महंमद शफी तिथे हजर होते. त्यांना सुमनचा आवाज आवडला आणि लगेच त्यांनी त्यांच्या ‘मंगू’ सिनेमाकरीता त्यांना साईन केले.

विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली

काहींच्या मतानुसार सुमन कल्याणपूर यांचे हिंदी सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळेच झाले.एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला होता. त्यांनी एचएमव्हीकडे त्यांची शिफारस केल्याचे म्हटले जाते. “कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे” हे त्यांचे रूपेरी पडद्यावरच पहिले गीत म्हटले जाते.मराठी, हिंदी, बंगाली, उरीया, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपूरी,गुजराती अश्या विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. गझल, ठुमरी, भक्तिगीते या गीतप्रकारांची सुमनताईंना अधिकच गोडी होती.

स्पर्धा जबरदस्त मोठी

सुमनताई गायकीच्या क्षेत्रात आल्या तेव्हा (१९५४) त्यावेळी लतांचा स्वर आसमंतात संपूर्ण तेजाने चमकत होता. आशाताईंचा देखील तो उमेदवारीचा कालखंड होता. शमशाद, गीतादत्त, सुरैया या लताला सिनियर असलेल्या गायिका कार्यरत होत्याच. तेव्हा स्पर्धा जबरदस्त मोठी होती. अशा वातावरणात लता आणि इतर दिग्गजांनी नाकारलेली गाणी त्यांच्या वाटल्या आली ती त्यांनी तन्मयतेने गायली.

त्यांची काही लोकप्रिय मराठी गाणी

१ ) रिमझिम झरते श्रावण धारा

२ )  शब्द शब्द जपून ठेव

३ )  केशवा माधवा

४ ) ओमकार प्रधान रूप गणेशाचे

५ ) जिथे सागरा धरणी मिळते

६ ) नाविका रे वारा वाहे रे

७ ) केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर

८ ) नाविका रे वार वाहे रे

९ ) नकळत सारे घडले

१० ) पाखरा जा दुर देशी

हिंदी गाणी

११ ) ना तुम हमे जानो

१२ ) दिल गमसे जल रहा

१३ ) मेरे मेहबूब न जा

१४ ) युं हि दिल ने चाहा था

कल्याणपूर यांना मिळालेले पुरस्कार

सुमन कल्याणपूर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१० सालच्या राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्याशिवाय मोहम्मद रफी पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार आणि झी मराठी वाहिनीच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. सुमन कल्याणपूर यांच्या जीवनचरित्रा वर आधारीत “सुमन सुगंध” हे आत्मचरित्र २००९ साली प्रकाशित झाले होते. त्याचे लेखन सुप्रसिध्द निवेदिका मंगला खाडिलकर यांनी केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us