
अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. काल आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड केल्यानंतर काल सायंकाळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र आता त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? याबाबत चर्चा सुरू झाली झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकोटे यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी सुनेत्रा पवार याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, आम्ही संपूर्ण अस्थिकलश मुंबईला आणला आहे. प्रत्येक जिल्ह्यात अस्थी कलश ठेवणार आहोत. त्यानंतर विधिवत विसर्जन करणार आहोत. काही ठिकाणी शोकसभा सुरू आहेत. अजूनही लोक डिस्टर्ब आहेत. विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलताना कोकाटे म्हणाले की, विलिनीकरणाचा निर्णय हा कौटुंबिक निर्णय आहे. त्यावर वहिनीच निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल.
पुढे बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, विलिनीकरणाबाबत दादांची चर्चा वहिनींसोबत झाली असेल. आम्हा कुणाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही. वहिनी आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्याच त्यावर निर्णय घेतील. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच होणार. दुसरा होणार नाही. सर्व पक्ष एकत्र आले तरी वहिनीच अध्यक्ष होतील. त्याच उत्तराधिकारी, राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री आणि गटनेत्याही असतील.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची जागा घेतली आहे. सुनेत्रा पवार खात्यांचेही वाटप करण्यात आले आहे. क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खातं सुनेत्रा पवार यांनी देण्यात आले आले आहे. मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थखाते मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते हे खाते आमच्या पक्षाला मिळावं अशी मागणी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.