हीच का संस्कृती, सुनेत्रा वहिनींची खिल्ली…काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर रुपाली चाकणकर संतापल्या; केली मोठी मागणी!
सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने टीका करताच रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी "विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करते,हीच त्यांची खरी ओळख" असे म्हटले आहे.

बीडमधील एका व्हिडीओवरून राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडे यांनी थांबवल्याने हा विषय चर्चेत आला. त्यानंतर काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली. यावेळी त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधण्यात आल्याने वाद आणखी वाढला आहे. आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत काँग्रेसवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मोठी मागणी केली आहे. “विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करते,हीच त्यांची खरी ओळख.” आदरणीय दादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा वहिनींची खिल्ली उडवणं यातुन, काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचे दर्शन होत आहे” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
वाचा: अभिजीत दीपकेची एकूण संपत्ती किती? कमाईचा स्त्रोत काय?
“विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करते,हीच त्यांची खरी ओळख” .
आदरणीय दादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा वहिनींची खिल्ली उडवणं यातुन, काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचे दर्शन होत आहे. काँग्रेसने आपल्या या…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 4, 2026
काय आहे रुपाली चाकणकर यांची मागणी?
पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेसने आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा आहे. दुर्दैवाने आज स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसनेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी यांच्याविषयी वापरलेली भाषा ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. स्व.अजितदादांच्या पश्चात अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी जबाबदारी स्वीकारली,वैयक्तिक दुःखावर मात करत जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले.अशा एका महिलेचा सन्मान करण्याऐवजी तिचा अपमान करण्याची काँग्रेसची मानसिकता महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही.
शेवटी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, एखाद्या महिलेच्या कर्तृत्वाला उत्तर देता येत नसेल, तर तिच्यावर वैयक्तिक टीका करून तिचा अवमान करणे ही काँग्रेसची राजकीय संस्कृती आहे का? महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आज स्वतःच आपला खरा चेहरा महाराष्ट्रासमोर उघड केला आहे.
