UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?

युपीएससीची परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुले मागे असतात. युपीएससी परीक्षेत यंदा मराठी टक्का कमी झाला आहे. युपीएससीमधील मराठी टक्का असाच घसरला तर मराठी आयएएस अधिकारी दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी टक्का का घसरतोय याचा घेतलेला आढावा

UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?
upsc civil services exam 2023Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 12:44 PM

देशातील सर्वात अवघड आणि उमेदवारांचा कस पाहणाऱ्या युपीएससीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( युपीएससी ) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालात यंदा मराठी टक्का घसरला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने पहिला क्रमांक तर अनिमेष प्रधान याने दुसरा आणि अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी यश मिळविले असले पहिल्या दहामध्ये एकही महाराष्ट्राचा विद्यार्थी नाही तर तरी पहिल्या शंभर विद्यार्थ्यात देखील मराठी उमेदवारांची संख्या थोडी कमी झाली आहे. दरवर्षी पहिल्या शंभर उमेदवारात महाराष्ट्रातील 10 ते 12 उमेदवारांचा समावेश असतो. यंदा केवळ पाच ते सहा उमेदवारांनाचा पहिल्या शंभरांत स्थान मिळविता आले आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षांत मराठी मुलांचा टक्का का घसरला याचा घेतलेला धांडोळा….

आयएएस बनण्याचे ध्येय बाळगुन दरवर्षी देशभरातील सुमारे नऊ ते दहा लाख लोक परीक्षेला बसतात. परंतू त्यातील केवळ एक हजार मुलांची निवड होते. इतकी ही परीक्षा अवघड असते. यंदा नागरी सेवा परीक्षा 2023 च्या मुलाखती जानेवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या. यंदा पहिल्या शंभर मुलांमध्ये महाराष्ट्रातील पाच ते सहा मुले आहेत. पहिल्या पाचशे मुलांमध्ये 25 ते 30 उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. निवड झालेल्या एकूण मुलांमध्ये 87 हून अधिक उमेदवार राज्यातील असून हे प्रमाण 8.6 टक्के आहे.

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी भाषणांच्या व्हिडीओंमुळे मराठी मुलांमध्ये युपीएससीबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मराठी मुलांना आपले राज्य सोडून केंद्रीय पातळीवर नोकरी करायची मानसिक तयारी नसायची, त्यात युपीएससी म्हटले की देशभरात कुठेही बदली होणार म्हणून मराठी मुलांना या करीयरची धास्ती वाटायची. परंतू आता हळूहळू सुधारणा झाल्याने मराठी मुले देखील युपीएससी बाबत जागृत होत आहेत. तरीही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत युपीएससीत मराठी मुलांचा टक्का कमीच आहे.

मराठी मुलांची टक्केवारी का कमी ?

कुटुंबापासून दूर न जाण्याची प्रवृत्ती – युपीएससीत पास झाले तर भारतात कोठेही बदली होते. त्यामुळे आपल्या कुटुंबापासून दूर न जाण्यासाठी सिव्हील सर्व्हीस हे करीयर निवडले जात नाही.

इंग्रजी भाषेचा न्यूनगंड असणे – ही परीक्षा केवळ इंग्रजी भाषेत द्यावी लागेल या भीतीपोटी शहरातील मुलांसोबत आपला निभाव लागणार नाही म्हणून ही परीक्षा देणे टाळतात.

जबरदस्त स्पर्धा – या परीक्षेत स्पर्धा मोठी असते. मागील वर्षी निवड झालेले अधिकारी देखील आयएएस होण्यासाठी पुन्हा परीक्षा देतात. त्यातले बरेच जण आधी निवड होऊनही ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. एवढी मोठी स्पर्धा असते.

मोठा अभ्यासक्रम आणि कठीण प्रश्न – एमपीएससी पेक्षा या परीक्षेचे प्रश्न किचकट असतात. आणि उत्तरे सहज मिळत नाही. मुख्य परीक्षा लेखी असते. तेथे कस लागतो.

वैकल्पिक विषय – युपीएससी मध्ये एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो. तो राज्याच्या परीक्षेत नसतो. या वैकल्पिक विषयाची काठीण्य पातळी पदवी परीक्षेच्या तोडीची असते.

कोरोनाकाळाने आर्थिक कणा कोलमडला

आयएएस किंवा आयपीएस वा इतर प्रशासकीय सेवांमध्ये करीयर घडविणाऱ्या बार्टी, महाज्योती अशा संस्थांना केवळ निधी दिला म्हणजे सरकारचे काम संपले असे होत नाही. तर सरकारने अशा करीयर घडविणाऱ्या संस्थांना उत्तम शिक्षक आणि स्डटी मटेरियल मिळावे यासाठी देखील प्रयत्न केले पाहीजेत असे शिवविद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस ॲकेडमीचे संस्थापक विजय कदम यांनी म्हटले आहे. केंद्रीय सिव्हील सर्व्हीसमध्ये मराठी मुले कुठेच दिसत नव्हती त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार बाळासाहेब ठाकरे आयएएस ॲकेडमीची स्थापना झाल्याचे कदम यांनी सांगितले. कोरोना काळामुळे मराठी मध्यमवर्गीय समाजाचा आर्थिक कणा कोलमडला आहे. त्यामुळे एक ते दीड लाखाची फी देणे मराठी पालकांना परवडत नसल्याची खंतही विजय कदम यांनी व्यक्त केली आहे. मागे सरकारने ‘बार्टी’ सारख्या संस्थेचा निधी रखडवला होता. सरकारने निधीबरोबरच अशा संस्थांसाठी खास समर्पित तज्ज्ञ शिक्षकांची टीम आणि स्टडी मटेरियल देखील पुरविले पाहीजेत असेही त्यांनी सांगितले.

करीयरचा सेंकड ऑप्शनही हवा

युपीएससीच्या परीक्षेत मराठी टक्का कमी झाला आहे असे मला वाटत नाही. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून उलट मराठी मुलांचे प्रमाण वाढले आहे. परंतू दिल्लीत जशी वाजीराम आयएएस अकादमी आहे तशी ट्रेंनिंग इन्स्टिट्यूट पुणे आणि मुंबई सारख्या शहरात असायला हवीत असे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. मुलांना आयएएसची तयारी करताना त्यांनी सेंकड करीयरचा ऑप्शन ठेवला पाहीजे. लाखो मुले जीव तोडून अभ्यास करतात. त्यामुळे फार कमी लोकांना यश मिळते. त्यात थोडा नशीबाचाही भाग असतो. माझ्या ओळखीचे एक प्रायमरी टीचर आठव्या प्रयत्नात यशस्वी झाले. त्यामुळे मुलांनी करीयरचा सेंकड बी ऑप्शनही तयार ठेवायला हवा. कारण या परीक्षेत पाच ते सात टक्के नशीबाचाही भाग असतो. त्यामुळे अपयश आल्यास मुलांना नैराश येऊ शकते. मुलांनी बारावीपासूनच जनरल नॉलेज आणि चाचणी पेपरचा सराव करायला हवा आणि जोरदार तयारी करायला हवी. परंतू अपयश आल्यास खचू नये असा सल्लाही विश्वास पाटील यांनी दिला आहे.

percentage of ias officers by their home state

percentage of ias officers by their home state

युपीएससीचा प्रवास कसा असतो ?

1 ) पूर्व परीक्षा, 2 ) मुख्य परीक्षा आणि 3 ) मुलाखत अशा तीन टप्प्यात युपीएससीची परीक्षा होते. कोणत्याही शाखेतील पदवीधराला ही परीक्षा देता येते. पहिल्या पेपरच्या आधारे कटऑफ तयार होत असते. दुसरा पेपर सीसॅट क्वालीफाईंग पेपर असतो. यासाठी किमान 33 टक्के मार्कांची गरज असते. नंतर कट ऑफ नुसार निवडलेले उमेदवार मुख्य परिक्षेला निवडले जातात. हे दोन्ही पेपर उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मुख्य परीक्षा खूपच अवघड असते.

कॅडरची निश्चिती कशी होते

युपीएससीत पास झाल्यानंतर एकूण 24 प्रशासकीय सेवात काम करण्याची संधी असते. या सेवांची दोन वर्गवारी असते. पहिली ऑल इंडिया सर्व्हीसेस, यात आयएएस ( इंडीयन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हीसेस ) आणि आयपीएस ( इंडीयन पोलीस सर्व्हीसेस ) यांचा समावेश होतो. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना आयएएस कॅडर मिळते. यात ज्यांची निवड होते त्यांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे कॅडर दिले जाते. नंतर सेंट्रल सर्व्हीस येते, यात ग्रुप ए आणि ग्रुप बी सर्व्हीसेसचा अंतर्भाव असतो.

ग्रुप ए आणि बी सर्व्हीस म्हणजे काय ?

ग्रुप ए सर्व्हीस म्हणजे इंडीयन फॉरेन सर्व्हीस , इंडीयन सिव्हील अकाऊंट सर्व्हीस, इंडीयन रेव्हेन्यू सर्व्हीस ( इन्कम टॅक्सची पोस्ट ), इंडीयन रेल्वे सर्व्हीस ( IRTS आणि IRPS ) आणि इंडीयन इन्फॉर्मेशन सर्व्हीस ( IIS ) असा भारतीय प्रशासकीय सेवा यात मोडतात. तसच ग्रुप बीमध्ये आर्म्ड फोर्सेस हेडक्वॉर्टर्स सिव्हील सर्व्हीस, पुडुचेरी सिव्हील सर्व्हीस, दिल्ली एण्ड अंदमान निकोबार आयलॅंड सर्व्हीस आणि पोलिस सर्व्हीस या सारख्या सेवा असतात.

युपीएससीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ( बार्टी ), स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर्स मुंबई, यशदा नावाने प्रचलित असलेली डॉ. आंबेडकर सेंटर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पुणे, पुणे युनिव्हर्सिटी कॉम्पिटेटिव्ह सेंटर पुणे, प्री.आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर, प्री.आयएएस ट्रेनिंग सेंटर नागपूर, प्री.आयएएस कोचिंग सेंटर फॉर एससी/ओबीसी छत्रपती संभाजीनगर अशा राज्य सरकारच्या शिक्षणसंस्थांत दरवर्षी मुलांना युपीएससीचे प्रशिक्षण दिले जात असते.

महाराष्ट्रातून 87 उमेदवार यशस्वी झाले

युपीएससीत पहिल्या दहामध्ये एकही मराठी उमेदवार निवडला गेलेला नाही. महाराष्ट्रातील टॉपरचा विचार करायचा तर प्रकाश खाडे यांचा 42 क्रमांक आला आहे. त्यानंतर नेहा उद्धव सिंह राजपूत यांचा 51 वा क्रमांक, अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे यांचा 81 वा क्रमांक आला आहे. एकूण 87 उमेदवारांची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.

पूर्वीपासून ठरविले होते…

प्रकाश खाडे यांनी त्याला त्याचा धाकटा भाऊ तसेच आयएएस मित्र शुभम भैसारे यांनी मार्गदर्शन केल्याचे म्हटले आहे. तर आयपीएस अधिकारी अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे यांनी आपले पालक राज्य सरकारी कर्मचारी असून या क्षेत्रात यायचं हे पूर्वीपासून ठरविल्याचे म्हटले आहे. हिरडे यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी घेतली असून ते ठाण्यातील टिकुजीनि वाडीत राहातात.

समाजासाठी काही करायचे आहे

256 वा रॅंक मिळविणारे स्मित पटेल यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समाधान असले तरी मी पुन्हा पुढच्या वर्षीची परीक्षा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी शेतकरी कुटुंबातील असून समाजासाठी काही तरी करण्यासाठी काही बदल घडविण्यासाठी हातात पॉवर असणे गरजेचे असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा समजले

546 वा रॅंक मिळालेल्या नाशिकच्या वृषाली बालपांडे यांनी आपण 2020 मध्ये सेंट झेवियर कॉलेजातून ग्रॅज्यूएट झाल्यानंतर युपीएससीच्या तयारीला लागल्याचे म्हटले आहे. हा माझा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या दोन प्रयत्नात मला कॉन्फीडन्स नव्हता. यंदा मला एक्झाम स्ट्रक्चर समजले आणि दिल्लीतून तयारी करुन पास झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाच वर्षे घरच्यांनी साथ दिली

546 वा रॅंक आलेल्या अपूर्व बालपांडे यांनी आपला हा पाचवा प्रयत्न होता आणि पाच वर्षे माझ्या घरच्यांनी मला साथ दिली. माझे स्वप्न पूर्ण झाल्याने आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याचे म्हटले आहे.

वडीलांकडून प्रेरणा मिळाली

माझे वडील निवृत्त पोलिस अधिक्षक आहेत. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाल्याचे युपीएससीतून देशात 706 वा रॅंक मिळालेल्या नाशिकच्या सुरज निकम यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले. कोणताही कोचिंग क्लासेस न लावता सुरजला हे यश मिळाले आहे. हा प्रवास कठीण होता. मला माझ्या चुका दुरुस्त करायला वेळ द्यावा लागला. परंतू पाचव्या प्रयत्नात आपल्याला यश आल्याचे सुरज याने म्हटले आहे.

नवीमुंबईतील नेरुळ येथील वृषाली कांबळे देशात 310 रॅंकने उत्तीर्ण झाल्या आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डॉ. अंकेत जाधव यांचा 395 वा क्रमांक आला आहे. धुळ्याच्या हिंमाशू टेंभेकर 738 वा रॅंक आला आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.