मुलगा मेला म्हणून सोडून दिला, पण 3 महिन्यांनी पुन्हा जिवंत सापडला, ‘त्या’ चमत्काराची महाराष्ट्रात चर्चा

Washim News: तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहार राज्यातील एक तरुण वाशीम जिल्ह्यातील मानोरा वनपरीक्षेत्रात सापडला आहे. जयपाल नावाचा हा तरुण आपल्या कुटुंबापासून दूर गेल्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृत्यू झाला असावा असे गृहीत धरले होते. मात्र तो जिवंत सापडला आहे.

मुलगा मेला म्हणून सोडून दिला, पण 3 महिन्यांनी पुन्हा जिवंत सापडला, त्या चमत्काराची महाराष्ट्रात चर्चा
Boy Found Alive
| Updated on: Oct 19, 2025 | 7:15 PM

वाशीममधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहार राज्यातील एक तरुण वाशीम जिल्ह्यातील मानोरा वनपरीक्षेत्रात सापडला आहे. जयपाल नावाचा हा तरुण आपल्या कुटुंबापासून दूर गेल्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृत्यू झाला असावा असे गृहीत धरले होते. मात्र, अखेर तो वनक्षेत्रात सलीम अन्सारी या व्यक्तीला आढळल्याने त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण उजळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जयपाल जंगलात आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान जंगलात एक तरुण भटकंती करताना आढळला. संशय आल्याने त्यांनी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आपले नाव जयपाल असल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्याच्याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे आणण्यात आले.

कुटुंबाशी संपर्क साधला

कर्तव्यावर हजर असलेले पोलिस शिपाई विजय गंगावणे यांनी त्याची मानसिक स्थिती समजून घेतली आणि त्याची विचारपूस केली. जयपालच्या अस्पष्ट बोलण्यातून गावाचे नाव समजले. फक्त गावाच्या नावावरून गुगल मॅप या सहाय्याने त्या गावातील पान शॉपच्या बोर्डवरील मोबाईल क्रमांकावर कॉल करून बस्ती समारा गावातील त्याच्या कुटुंबाचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर बिहार राज्यातील बजरंग चौक, जिल्हा बत्तीसअमरा येथील त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला.

कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू

यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे आई-वडिलांशी बोलण्याची सोय केली. स्क्रीनवर आपल्या मुलाला जिवंत पाहताच कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. तीन महिन्यांपासून मृत्यू समजलेल्या मुलाला जिवंत पाहताच संपूर्ण कुटुंब भारावून गेले होते.

जयपाल बिहारला रवाना

दरम्यान, आता जयपाल या तरुणाला कारंजा येथील स्थानिक नागरिक सलमान मेमन यांनी पोलीस निरीक्षक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विजय गंगावणे याच्या सहकार्याने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षितपणे बिहारला रवाना केले आहे. या हृदयस्पर्शी घटनेमुळे मानोरा परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, पोलिस विभाग आणि स्थानिक नागरिक याचे सर्वत्र कौतुक होत आहे.