Video: भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी, यमुनेत 50 जणांची नाव उलटून अपघात, 4 मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

रक्षाबंधनाच्या सणासाठी समगरा गावातील महिला, मुले आणि काही पुरुष हे मरका घाटावर पोहचले होते. यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी नावेतून प्रवास सुरु केला. या नावेत ५० जण होते. नाव यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर असंतुलित झाली आणि पलटली.

Video: भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी, यमुनेत 50 जणांची नाव उलटून अपघात, 4 मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
25 बहिणींना जलसमाधी
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 5:47 PM

लखनौ- भावांकडे रक्षाबंधनाला (Raksha Bandhan)निघालेल्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी (Sisters drown)मिळाल्याची धक्कादायक दुर्घटना उ. प्रदेशात घडली आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी नाव (Boat Sink)यमुनेत उलटल्याने ही दुर्घटना घडली. या नावेत मुलांसह 20 ते 25  महिला प्रवास करीत होत्या, अशी माहिती आहे. हा सगळ्या महिला पक्षाबंधनासाठी माहेरी निघाल्या होत्य, अशीही माहिती समोर येते आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्याला सुरुवात केली आहे. पाणबुड्यांच्या मार्फत बुडालेल्यांचा शोध घेण्यात येतो आहे. आत्तापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले असून, 25 हून जास्त जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

कसा झाला अपघात

रक्षाबंधनाच्या सणासाठी समगरा गावातील महिला, मुले आणि काही पुरुष हे मरका घाटावर पोहचले होते. यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी नावेतून प्रवास सुरु केला. या नावेत 50 जण होते. नाव यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर असंतुलित झाली आणि पलटली.

मोटारसायकलीही ठेवल्या नावेत

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या गावाहून पत्नीला घेऊन सासरी राखी बांधण्यासाठी निघालो होतो. नदी किनारी आल्यावर तिथे एकच नाव होती. दुपारी तीन वाजण्याचा सुमार होता. पलिकडे जाण्यासाठी अनेकांची गर्दी तिथे जमा झाली होती. बघता बघता नावेत ४० ते ५० प्रवासी जमा झाले. काही जणांनी त्यांच्या मोटारसायकलीही या नावेतच ठेवल्या होत्या.

बायको आणि मुले गेली वाहून

नाव जेव्हा नदीच्या मध्यभागी आली, तेव्हा नाव हलण्यास सुरुवात झाली. नावेतील लोकं घाबरुन नावेतच इकडून-तिकडे जाऊ लागले. यातच एका बाजूला लोकांची संख्या जास्त झाली आणि नाव एकदम पलटली. काही जण पोहू लागले, काही जण मुलांचा आणि महिलांचा शोध घेत होते. बघता बघता अनेक जण नदीच्या धारेत वाहून जात होते. या अपघातात महिला आणि लहान मुलं मात्र बुडाली. याचवेळी आजूबाजूने जात असलेल्या एक दोन नावांनी बुडालेल्या माणसांना वाचवण्यास सुरुवात केली. अशातच मीही एका नावेवर चढलो पण बायको आणि मुलं वाहून गेलीत.

मोटारसायकलही बुडाली

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नावेवर ४० ते ५० जण होते. त्यातील १५ जणांना वाचवण्यात आले २५ ते ३० जण वाहून गेले आहेत. नदीतून वाचून आलेल्या के पी यादव यांनी सांगितले की, मी लखनौतून समधराला आलो होतो. समधरेला बायकोला सोडून मी बहिणीकडे रक्षाबंधनाला निघालो होतो. मला बरैचीला जायचे होते. माझ्याकडे माटरसायकल होती. नावेत ती ठेवली होती. नाव बुडाल्याने आता मोटारसायकलही गेली आहे.