Special Report : दीपके फॅक्टर 2029 मध्ये किती चालणार? संकेत काय?
अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांचे राष्ट्रीय आंदोलन यशस्वी केले. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यशस्वी झाल्यावर, त्यांचे लक्ष्य आता 2029 च्या निवडणुका आहेत. 38 कोटी जेनझी मतदारांना आकर्षित करून ते राजकारणात येण्याऐवजी दबाव गट म्हणून काम करण्याची रणनीती आखत आहेत. त्यांची युवाशक्ती किती यशस्वी होईल?

देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर तरुणांचं मोठं आंदोलन उभं राहिलं. तरुणांनी तरुणांचं नेतृत्व केलं. कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. लाठीकाठी खाल्ल्या. डोकी फुटली. रक्त सांडलं, पण मुलांच्या पाठिचा कणा काही वाकला नाही. पोरं दिल्लीच्या जंतरमंतरवर ताकदीने उभी राहिली. आणि आमच्या सरकारमध्ये राजीनामा होत नसतो, असं म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला. देशात एक नवा इतिहास घडला. कॉकरोच जनता पार्टीने हे सर्व घडवलं. अन् त्याचा नायक होता अभिजीत दीपके. दीपकेंचं आता लक्ष्य 2029ची निवडणूक आहे. पण 2029मध्ये दीपकेंचा करिश्मा किती चालणार? खरोखरच त्यांना यश येईल? त्याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा.
अभिजीत दीपके कोण आहे?
अभिजीत हे मूळचे महाराष्ट्राचे. छत्रपती संभाजीनगरचे. गेल्या दोन वर्षापासून ते अमेरिकेत राहत आहेत. त्यांनी पुण्यातून पदवी घेतली आहे. अभिजीत तीन वर्ष आम आदमी पार्टीशी संलग्न राहिले आहेत. त्यांनी आपमध्ये पार्टी कम्युनिकेशनचं काम केलं. त्यानंतर ते बोस्टन विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी मास्टर्सची पदवी घेतली.
सोशल मीडियावर सक्रिय
कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यापूर्वी अभिजीत सोशल मीडियावर सक्रिय होते. सोशल मीडियावर व्यंगात्मक पोस्ट करायचे. त्यांनी नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर पोस्ट केल्या आहेत. त्यांनी भारत- अमेरिकेच्या डीलवरही सवाल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही ट्विट केलं आहे.
कॉकरोचची स्थापना कशी?
अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीची स्थापना ही मजाक मजाकमध्ये झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली. त्यांनी देशातील बेरोजगार तरुणांना कॉकरोच आणि परजीवी म्हटलं. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी पसरली. विधानावर वादळ उठल्यावर सरन्यायाधीशींनी त्यावर खुलासाही केला. व्यवसायात येण्यासाठी ज्यांनी खोट्या पदव्यांचा वापर केला. त्यांच्याबद्दल मी बोललो होतो, असं ते म्हणाले. तसेच मीडियाच्या एका वर्गाने माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा दावाही त्यांनी केला होता.
पण सरन्यायाधीशांच्या या विधानाची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. अभिजीत दीपकेंनी तर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. तसेच जे आळशी, बेरोजगार, कामचुकार आणि काहीच करू शकणारे नाहीत, अशा लोकांनी आमच्या पक्षात यावं, अशी उपरोधिक पोस्ट टाकली. अभिजीतची इन्स्टावरील ही पोस्ट अधिकच व्हायरल झाली. इंटरनेवर कॉकरोच जनता पार्टी नावाने पक्ष स्थापन झाला. इन्स्टाग्रामवर त्यांचे 2.2 कोटी फॉलोअर्स झाले. दोन लाखाहून अधिक लोकांनी वेबसाईटवर जाऊन सदस्य नोंदणी केली. आता इन्स्टावरील त्यांचे फॉलोअर्स चार मिलियनहून अधिक आहेत.
टीकेनंतर भारतात परतण्याचा निर्णय
अभिजीत दीपके परदेशातून ट्विट करत होते. त्यावर लोकांनी टीका करायला सुरुवात केली. परदेशात राहून आंदोलन करता येणार नाही, असं सुनावलं जाऊ लागलं. त्यानंतर त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. नीट परीक्षा घोटाळ्या प्रकरणी त्यांनी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन छेडण्याची घोषणा केली. अभिजीत यांचा हाच निर्णय टर्निंग पॉइंट ठरला.
बाबासाहेब आणि जयभीम
6 जून रोजी अभिजीत दिल्लीत आले. त्यांनी विमानतळावर उतरताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं माय ऑटोबायोग्राफी पुस्तक उंचावून सर्वांना अभिवादन केलं. त्यानंतर जंतरमंतरवरच्या आंदोलनाचं नेतृत्व सांभाळलं. या आंदोलनात जयभीमचे नारे दिले गेले. सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं. 23 दिवस त्यांनी उपोषण केल्यानंतर त्यांना पहाटे पहाटेच पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांचं उपोषण मोडलं. त्यामुळे आंदोलक भडकले. तिथूनच आंदोलनाचा भडका उडाला. 19 जुलै रोजी आंदोलकांनी संसद मार्चची तयारी सुरू केली. 20 जुलै रोजी 50 हजाराहून अधिक तरुणांनी दिल्लीत जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केलं.
त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. पाण्याचा फवारा मारला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. कथितपणे पॅलेट गनचाही वापर करण्यात आला. या धुमश्चक्रीत 100 हून अधिक आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. पोलिसांनी कोवळ्या पोरांवर केलेल्या लाठीमाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. देशभरात इतर राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जोरदार आंदोलन केलं. दुसरीकडे विरोधकांनी याच मुद्द्यावर संसद दणाणून सोडलं. संसदेचं कामकाज ठप्प झालं. इकडे रोज जंतरमंतरवर आंदोलन होत गेलं. तरुणांचा आक्रोश आणि देभरात उमटलेल्या संतापामुळे अखेर 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने आंदोलकांच्या इतर मागण्याही मंजूर केल्या आणि अखेर आंदोलनाची सांगता झाली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिजीत दीपके स्वत: दलित कुटुंबातून आहेत. त्यांच्या आंदोलनात बाबासाहेबांचे फोटो होते. भगत सिंग यांचे फोटो होते. निळे झेंडे होते. जयभीमचा जयघोष होता. पण तरीही हे आंदोलन सर्वसमावेशक होतं. दलितांचं आंदोलन असं या आंदोलनाला दीपकेंनी स्वरुप येऊ दिलं नाही. ही या आंदोलनाची खासियत होती.
परदेशात काय घडलं?
गेल्या काही वर्षात दक्षिण आशियातील अनेक देशात तरुणांची आंदोलने झाली. तरुणांनी निदर्शने केली. त्यात श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशचा समावेश आहे. बेरोजगारी, महागाई आणि भविष्याची चिंता आदी कारणांमुळे ही आंदोलने झाली. नेपाळमध्ये तर जेनजीच्या आंदोलानामुळे सरकारला पायउतार व्हावं लागलं. पण अभिजीत श्रीलंका आणि नेपाळच्या जेनजीशी भारताच्या जेनजीची तुलना करत नाही. त्याचं म्हणणंय की, भारतातील जेनजी हिंसा भडकवत नाहीये.
देशातील तरुण सध्याच्या राजकीय व्यवस्थेला वैतागला आहे. येणाऱ्या काही काळात हा तरुण बदल घडवण्याची मागणी करे. 10-12 वर्षात तरुणांनी हिंदू-मुस्लिम यांच्यापलिकडे काहीच ऐकलेलं नाहीये. तरुणांना ही राजकीय व्यवस्था बदलायची आहे. तांत्रिकदृष्ट्या अॅडव्हान्स झालं पाहिजे. रोजगार मिळायला हवा. जगातील बेस्ट देशांशी आपली तुलना झाली पाहिजे. किती दिवस पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशशी तुलना करत राहणार? असा सवाल त्यांनी केला.
अर्ध्याहून अधिक देश तिशीतला
अभिजीत दीपके म्हणतो, देशात 1.4 अब्ज लोकांमध्ये अर्धे लोक तिशीतील आहेत. तरीही तरुणांचा राजकारणातील सहभाग अत्यंत मर्यादित आहे. लोक निराश आहेत. कारण त्यांचं ऐकलं जात नाहीये.
38 कोटींवर लक्ष्य
2029 पर्यंत देशात 38 कोटी जेनजी मतदार तयार होणार आहेत. हे सर्व प्रथम मतदार आहेत. या 38 कोटी जेनजींना डोळ्यासमोर ठेवूनच दीपके रणनीती आखत आहेत. अभिजीत दीपकेंनी राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं. मात्र, 2029मध्ये आम्ही भूमिका घेऊ असंही स्पष्ट केलं. आम्ही कुणाला मतदान करायचं हे सांगणार नाही. जेनजीला सांगण्याची गरज नाही. त्यांना सर्व समजतं. आम्ही राजकारणात येणार नसलो तरी दबाव गट म्हणून काम करणार आहोत, असंही ते म्हणाले.
भाजपच्या नव मतदारांना धक्का
प्रत्येक निवडणुकीत भाजपचा दोन गोष्टींवर अधिक भर राहिला आहे. नव मतदार आणि महिला मतदार हा भाजपचा मुख्य बेस राहिला आहे. या मतदारांना आकर्षिक करण्यासाठी भाजप कोणतीही कसूर सोडत नाही. तसेच या मतदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगला प्रभावही आहे. परंतु, अभिजीत दीपके यांच्या आंदोलनामुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून पंतप्रधानांसह भाजपची खिल्ली उडवली जात आहे. हे सर्व जेनजी करत आहे. 2029मध्ये या जेनजींची संख्या 38 कोटींवर जाणार आहेत. हे सर्व जण प्रथम मतदार असणार आहेत. भाजपचा हा मुख्य बेसच दीपकेंच्या आंदोलनाने सद्या तरी हलला आहे. त्यामुळे 2029पर्यंत हा बेस टिकवणं भाजपसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.
दीपकेंचा इम्पॅक्ट जाणवणार?
अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं. देशभरात त्यांचं कौतुक झालं. अभिजीत सध्या देशभरातील तरुणांचा हिरो आहे. त्यामुळे 2029पर्यंत त्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 2029च्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षात दीपकेंना तरुणांची मोट बांधण्याची संधी आहे. या काळात ते संघटना कशी पुढे नेतात? कोणती आंदोलने घेतात आणि सहकाऱ्यांना कशा पद्धतीने सांभाळून ठेवतात? यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तरुणांना सोबत ठेवण्यासाठी त्यांना तीन वर्ष सतत ठोस कार्यक्रम द्यावा लागणार आहे. 2029मध्ये दीपके यांचा देशभरात किती प्रभाव पडेल हे 2029मध्येच स्पष्ट होईल. पण दीपके महाराष्ट्रातील असल्याने राज्याच्या राजकारणावर त्यांचा निश्चित प्रभाव राहणार असल्याचं जाणकार सांगतात.