आजवरची विक्रमी ग्रीन एनर्जी निर्मिती, अदानी ग्रीनची कॅपेसिटी 15,000 मेगावॅटच्या पार
अदानी ग्रीन एनर्जीने (एजीईएल) 15,539.9 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठून विक्रम रचला आहे. यामध्ये 11,005.5 मेगावॅट सौर, 1,977.8 मेगावॅट वारा आणि 2,556.6 मेगावॅट वारा-सौर हायब्रिड क्षमता समाविष्ट आहे. हा भारतातील सर्वात वेगवान ग्रीन एनर्जी विकास आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (एजीईएल) एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने ग्रीन एनर्जीची कॅपेसिटी 15,000 मेगावॅटच्या पार नेली आहे. त्यामुळे आता अदानी ग्रीन एनर्जीची कॅपेसिटी 15,539.9 मेगावॅट झाली आहे. ही भारतातील सर्वात वेगवान ग्रीन एनर्जी निर्मिती असून हा एक विक्रमच झाला आहे.
कंपनीच्या कार्यरत पोर्टफोलिओमध्ये 11,005.5 मेगावॅट सौर, 1,977.8 मेगावॅट वाऱ्याची आणि 2,556.6 मेगावॅट वारा-सौर हायब्रिड क्षमता समाविष्ट आहे, असं भारताची सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा कंपनी ठरलेल्या अदानी ग्रीन एनर्जीने म्हटलं आहे. यावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अदाणी ग्रीनने 15,000 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचा टप्पा गाठल्याची माहिती देताना आनंद होत आहे. ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि वेगवान हरित ऊर्जा निर्मिती आहे, असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.
एक्सवरून माहिती
उद्योगपती गौतम अदानी यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. खावडाच्या वाळवंटी परिसरापासून जगातील टॉप 10 ग्रीन पॉवर उत्पादकांमध्ये मिळवलेले हे गौरवाचे स्थान केवळ एक आकडा नाही. हा टप्पा आपल्या ग्रहाविषयी असलेल्या आमच्या बांधिलकीचे आणि भारताच्या हरित पुनरुत्थानाच्या दिशेने असलेल्या आमच्या दृढ संकल्पाचे प्रतीक आहे, असं अदानी यांनी म्हटलं आहे. एजीईएल ही भारताची पहिली आणि एकमेव नवीकरणीय ऊर्जा कंपनी आहे, जिने प्रामुख्याने ग्रीनफील्ड प्रकल्पांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
संघाच्या अथक प्रयत्नांचं यश
एजीईएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष खन्ना यांनीही कंपनीच्या ऐतिहासिक कामगिरीवर भाष्य केलं आहे. 15,000 मेगावॅटचा टप्पा पार करणे हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. हे यश आमच्या संघाच्या अथक प्रयत्नांचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. आमच्या प्रवर्तकांच्या दूरदर्शी नेतृत्वाशिवाय आणि आमचे गुंतवणूकदार, ग्राहक, कार्यसंघ आणि भागीदार जे प्रत्येक टप्प्यावर आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यांच्या अविचल पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते, असं आशिष खन्ना यांनी म्हटलं आहे.
अदानी कंपनीला नवीकरणीय उर्जेमध्ये जागतिक नेते म्हणून स्थान देण्याच्या गौतम अदानी यांच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन, स्वच्छ ऊर्जा अभूतपूर्व प्रमाणात आणि वेगाने वितरीत केली जाऊ शकते हे सिद्ध करून, एजीईएल नवोन्मेष आणि परिचालन उत्कृष्टतेमध्ये नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
13 राज्य आणि 7.9 घरांमध्ये वीज
एजीईएलचा 15,539.9 मेगावॅटचा ऑपरेटिंग पोर्टफोलिओ सुमारे 7.9 दशलक्ष घरांना वीज देऊ शकतो. उत्पादित केलेली स्वच्छ ऊर्जा 13 वेगवेगळ्या भारतीय राज्यांना प्रकाशमय करू शकते. एजीईएलचा कार्यकारी पोर्टफोलिओ नवीकरणीय उर्जेसह संपूर्ण ईशान्य प्रदेशाला ऊर्जा देऊ शकतो. अतुलनीय वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छ आणि परवडण्याजोग्या उर्जेसह भारताला शक्ती देण्याचे एजीईएलचे 10 वर्ष पूर्ण होण्याशी हा मैलाचा दगड जुळतो. 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा क्षमता 50,000 मेगावॅटपर्यंत वाढवून शाश्वत ऊर्जा उपायांसह भारत आणि जगाला शक्ती देण्याच्या आमच्या ध्येयावर ठाम राहण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही खन्ना यांनी स्पष्ट केलं.
अंतराळातूनही दिसणार
अदानी ग्रीन एनर्जी गुजरातच्या कच्छमधील खावडा येथील नापिक जमिनीवर 30,000 मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा रिन्यूएबल एनर्जी प्लांट बनवत आहे. 538 किलोमीटर लांब आणि एक किलोमीटर रुंद क्षेत्रात हा प्लांट बनवला जात असून तो पॅरिसपेक्षा पाचपट मोठा आहे. विशेष म्हणजे अंतराळातूनही हा प्लांट दिसणार आहे. हा प्लांट पूर्ण झाल्यावर एनर्जी स्त्रोतातील तो जगातील सर्वात मोठा पॉवर प्लांट होणार आहे. एजीईएलने आतापर्यंत खावडा येथे 5,355.9 मेगावॅट रिन्यूएबल एनर्जीची साठवणूक क्षमतेचं संचालन सुरू केलं आहे.
