ज्यांचा-ज्यांचा केजरीवालांनी प्रचार केला त्यांचा सुपडा साफ, या दोन बड्या नेत्यांची तर खुर्चीच गेली
Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. मात्र या दोन्ही नेत्यांना जनतेने नाकारले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीकडे लागले होते. पाच पैकी 3 राज्यांमध्ये सत्तांतर झाले आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आता नवीन पक्षाचे सरकार स्थापन करणार आहे. या निकालामुळे प्रादेशिक पक्षांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या निकालामळे विरोधी पक्षातील मोठ्या चेहऱ्यांच्या निवडणूक प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यात आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची चर्चा आता रंगू लागला आहे. कारण केजरीवाल यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. मात्र या दोन्ही नेत्यांना जनतेने नाकारले आहे.
केजरीवाल यांच्या स्टॅलिन यांच्यासाठी प्रचार
अरविंद केजरीवाल यांनी 20 एप्रिल 2026 रोजी चेन्नईतील पुलियंथोपे येथे स्टालिन यांचा उल्लेख आपला भाऊ असा करत त्यांच्या समर्थनार्थ रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपला विभाजनकारी असं म्हणत तमिळनाडूतील लोक भाजपाचा तिरस्कार करतात असं विधान केलं होतं. मात्र आता सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार स्टालिन यांचा डीएमके पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कारण अभिनेता थलपति विजय यांच्या नव्या TVK पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. याचाच अर्थ केजरीवाल यांचा प्रचार व्यर्थ ठरला आहे.
ममता बॅनर्जींसाठीही केजरीवाल मैदानात
केजरीवाल यांनी 26-27 एप्रिल रोजी ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला होता. बल्लीगंज येथील सभेत त्यांनी सैन्याच्या तैनातीवर प्रश्न उपस्थित केले होते. कोलकाता आणि हावडा येथे सभा घेऊन त्यांनी ममता बॅनर्जींसाठी मतांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांना बंगाल संस्कृतीवर हल्ला असे म्हटले होते. मात्र यानंतरही ममता बॅनर्जी यांना जनतेने नाकारले आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद आता जवळपास गेले आहे.
दोन्ही नेत्यांची सत्ता गेली
केजरीवाल यांच्या भाजपवरील आक्रमक टीकेचा आणि टीएमसीच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभांचा प्रत्यक्ष सकारात्मक परिणाम झालेला नाही. उलट भाजपाने याचा बंगालचा अपमान आणि भ्रम निर्माण करणारे राजकारण म्हणून फायदा घेतला. बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. या दोन राज्यांतील निकालांवरून असे दिसत आहे की अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव सध्या मर्यादित दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावर ते अँटी-भाजप चेहरा बनण्याच्या प्रयत्न करत आहेत, मात्र यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही.