Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

आसाममध्ये मान्सूनमुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत 21 जणांचा मृत्यू झाला असून, 5.64 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. शिवसागर जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. 872 गावं पाण्याखाली गेली असून, लष्कर आणि NDRF कडून 'ऑपरेशन जल राहत' अंतर्गत मदत व बचावकार्य वेगात सुरू आहे.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट
आसाममध्ये पुराचा तडाखा, अनेकांचा मृत्यू, बचाव पथकांचं कार्य सुरू
Image Credit source: social media
| Updated on: Jul 22, 2026 | 10:13 AM

Assam Flood Update : देशभरातील अनेक भागात मान्सून बरसत असून काही ठिकाणी पावसामुळे स्थिती बिकट झाली आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 13 मृत्यू शिवसागर जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांमधील तब्बल 5.64 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून 872 गावं पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे, पुरामुळे पाणी घरात शिरल्याने हजारो कुटुंब उघड्यावर पडली असून त्यांनी सुरक्षिततेसाठी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

असम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, शिवसागर, डिब्रुगढ, जोरहाट, गोलाघाट, चराईदेव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह एकूण 16 जिल्हे हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक गावांमध्ये आणि शेती क्षेत्रात पाणी शिरल्याने दैनंदिन जीवन ठप्प झाले असून अनेक भागांतील रस्ते संपर्कही खंडित झाला आहे.

21 जणांचा मृत्यू , शिवसागरमध्ये सर्वाधित जीवितहानी

गेल्या 24 तासांत पूर आणि त्यासंबंधित दुर्घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 13 मृत्यू केवळ शिवसागर जिल्ह्यात झाले असून या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधित कुटुंबांपर्यंत तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शेकडो गावं पाण्याखाली

पूरामुळे ग्रामीण भागाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील 872 गावं जलमय झाली असून 24 हजार हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. भातासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.

‘ऑपरेशन जल राहत’ सुरू

आसाममधील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन भारतीय सैन्याने राज्य प्रशासनाच्या विनंतीनुसार ‘ऑपरेशन जल राहत-3’ सुरू केलं आहे. शिवसागर, जोरहाट आणि चराईदेव जिल्ह्यांमध्ये तीन विशेष पूर बचाव पथके तैनात करण्यात आली असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि संसाधनं देखील त्वरित उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सैन्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, ब्रह्मपुत्र नदी जोरहाटजवळील निमाटीघाट परिसरात धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. याशिवाय दिखौ, दिसांग, बुरीदिहिंग आणि धनसिरी या नद्यांचाही जलस्तर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे दिखौ आणि दिसांग नद्या उच्चतम पूरपातळीच्या जवळ पोहोचल्याने सखल भागांतील नागरिकांसाठी धोका अधिक वाढला आहे.

तसेच राजधानी गुवाहाटीमध्येही अनेक भागांमध्ये जलभरावाची स्थिती कायम आहे. सतगाव, साउकुची, नोतबोमा, बोरागाव, मालीगाव, चांदमारी तसेच उत्तर गुवाहाटीतील अनेक वॉर्ड पाण्याखाली असून नागरिकांना वाहतूक आणि दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पूरग्रस्त भागांमध्ये NDRF आणि SDRFची पथके युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करत आहेत. शिवसागर, चराईदेव आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये NDRFची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. SDRFच्या 62 बोटींच्या मदतीने विविध भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आले आहे.

मदत छावण्यांमध्ये हजारो विस्थापित

प्रशासनाने विविध भागांमध्ये मदत छावण्या उभारल्या असून हजारो विस्थापित नागरिक त्याठिकाणी सध्या रहात आहेत. या छावण्यांमध्ये अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि वाढत्या जलस्तरामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us