कोणी केले राम मंदिराचे डिझाईन, दोन-चार नाही तर पंधरा पिढ्यांपासून मंदिराच्या आरखड्याचे काम

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. हा सोहळा 16 जानेवारीपासून सुरु होऊन सात दिवस राहणार आहे. राम मंदिराचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. या मंदिराचे डिझाईन तयार कोणी केले आहे? हे डिझाईन कधी तयार करण्यात आले ?

कोणी केले राम मंदिराचे डिझाईन, दोन-चार नाही तर पंधरा पिढ्यांपासून मंदिराच्या आरखड्याचे काम
Jitendra Zavar | Updated on: Jan 04, 2024 | 8:18 AM

नवी दिल्ली, दि. 4 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. मंदिराचे काम वेगाने सुरु आहे. कामाचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या मंदिराचे डिझाईन कोणी तयार केले आहे? याची अनेकांना उत्सुक्ता आहे. सोमनाथ मंदिर, मुंबईतील स्वामीनारायण मंदिर, कोलकाता येथील बिर्ला मंदिर तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा यांनीच अयोध्या राम मंदिराचे डिझाईन तयार केले. मंदिराचे डिझाईन तयार करणारी ही त्यांची पंधरावी पिढी आहे. हे मंदिर 161 फूट उंच आहे. 28,000 वर्ग मीटरमध्ये उभारले जात आहे.

कधी तयार केले डिझाईन

सोमपुरा परिवाराच्या पंधरा पिढ्या मंदिराचे डिझाईन तयार करण्याचे काम करत आहेत. विश्व हिंदू परिषदचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांनी चंद्रकांत सोमपुरा यांना 32 वर्षांपूर्वी राम मंदिरासाठी डिझाइन करण्यासाठी संपर्क केला. त्यांनाच हे काम देण्यात आले. त्यानंतर 1990 मध्येच त्यांनी मंदिराचे डिझाईन तयार केले. 1990 मध्ये कुंभ मेळाव्यात साधूसंतानी त्यांनी केले डिझाईनला मान्यता दिली. त्यानंतर 2020 मध्ये न्यायालयाचा निकाल आल्यानंतर डिझाईनमध्ये काही बदल करुन आजचे मंदिर उभारले जात आहे. चंद्रकांत सोमपुरा यांनी आतापर्यंत जगभरातील 200 पेक्षा जास्त मंदिराचे डिझाईन तयार करण्याचे काम केले आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचे अजोबा प्रभाशंकर ओघडभाई यांनी नव्या सोमनाथ मंदिराचे डिझाइन तयार केले होते.

लोखंडाचा वापर नाहीच

राम मंदिर निर्मितीसाठी कुठेही लोखंडाचा वापर केला नसल्याचे चंद्रकांत सोमपुरा यांनी सांगितले. राम मंदिरासाठी बंसी पहाडपूर येथील गुलाबी दगड आणि बलुआ दगडांचा वापर केला आहे. हजारो वर्षांपर्यंत मंदिर आहे तसेच राहणार आहे. बंसी पहाडपूर दगड जितका जुना होतो तितका तो मजबूत होतो. राम मंदिर निर्माण करण्यासाठी स्टील, लोखंडाचा वापर केला नाही. स्टीलचे आयुष्य कमी असते. त्याला जंगही लागते. यामुळे 80-100 वर्षांनंतर त्याला रिपेयर करावे लागते. यामुळे बंसी पहाडपूर दगड आणि बलुआ दगडांचा वापर मंदिर निर्मितीसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर हजारो वर्ष मजबूत राहणार आहे.

Follow Us