‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?
TMC- Mamata Banerjee : सुप्रीम कोर्टाने तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोरांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे फुटीर आमदाराने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्याकडे धाव घेतली आहे. कासिम सिद्दीकी यांनी आरोप केला की बंडखोरांनी त्यांची दिशाभूल केली.

पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आमदार, खासदारांनी मोठे बंड पुकारले. विधानसभा निवडणूक 2026 नंतर त्यांच्या अडचणी वाढल्या. एक एक करून अनेक खासदार आणि आमदारांनी त्यांची साथ सोडली. 20 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्रिपुरातील एका नवख्या पक्षात विलीनही केला. अजूनही त्यातील काही जणांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. आमदारांनी त्यांची साथ सोडली. पण आता त्यातील एका आमदाराने घर वापसी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार कासिम सिद्दीकी पक्षात परतले आहेत.
कासिम सिद्दीकींचा बंडखोरांना दणका
पश्चिम बंगालमधील अमडांगा विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर कासिम सिद्दीकी निवडून आले. त्यानंतर त्यांनी बंडखोरी केली. दिशाभूल करून आपल्याला बंडखोरांनी सोबत नेल्याचा दावा त्यांनी केला. मला तर वाटलं बंड केलं तरी ममता बॅनर्जी याच आपल्या नेत्या असतील. पण दीदी तर नव्हत्या. लोकांनी मला ममता बॅनर्जी यांच्यामुळेच निवडून आलो होतो. दीदीच माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यांनी मला तिकीट दिले. माझ्या प्रचाराला आल्या. यामुळे जिथे दीदी, तिथे आम्ही, असे ठरवल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले.
दिशाभूल करून नेले
कासिम सिद्दीकी यांनी बंडखोर खासदारांवर निशाणा साधला. ऋतब्रत यांनी एका बैठकीसाठी मला बोलावले होते. त्यात आपण वेगळा गट जरी केला तरी आपल्या नेत्या या ममता बॅनर्जी याच असतील असे त्यांनी मला सांगितले. त्याचवेळी एका पत्रावर माझी स्वाक्षरी घेण्यात आली. पण नंतर काही दिवसात हा वेगळाच प्रकार असल्याचे माझ्या लक्षात आले. कारण हा गट वेगळा तयार करण्यात आला होता. तिथे दीदी नव्हत्या. कासिम सिद्दीकी हे हुगळीमधील फुरफुरा येथील बोरो पीर अबू ब्रुक सिद्दीकीचे वंशज आहेत. 2024 पासून ते ममता बॅनर्जीचे जवळचे मानले जातात. 2026 मधील निवडणुकीत त्यांनी अमडांगा विधानसभा निवडणुकीत भाजपचे अरिंदम डे यांचा पराभव केला.
20 बंडखोरांना नोटीस
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा पराभव झाला. अनेक खासदारांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी NCPI या पक्षात प्रवेश केला. 20 खासदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. टीएमसी नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. याविषयीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांनी सर्व बंडखोर खासदारांना नोटीस बजावलत उत्तर मागवले आहे.
