IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पण पावसाचा व्यत्यय आणि सोनल दिनुषाच्या खेळीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण चौथ्या दिवशी फॉलोऑनचं गणित सोडवणंही तितकंच कठीण आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलंबोत सुरू आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंकेने 8 गडी गमवून 265 धावा केल्या आहेत. अजूनही श्रीलंकन संघ 238 धावांनी पिछाडीवर आहे. खरं तर या सामन्यात श्रीलंकेला 200 धावांच्या आत गुंडाळण्याची संधी होती. पण सोनल दिनुषाच्या झुंजार खेळीमुळे भारताचं गणित बिघडलं. खरंतर 173 धावांवर श्रीलंकेच्या 8 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ आरामात 200च्या आत श्रीलंकेला गुंडाळेल असं वाटलं होतं. पण सोनल दिनुषाने आठव्या विकेटसाठी केशारा नुवांथासोबत 57 धावांची भागीदारी केली. तसेच नवव्या विकेटसाठी लहिरू कुमारासोबत नाबाद 35 धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे शेवटच्या तीन विकेट घेताना भारतीय संघाला बऱ्याच धावा द्यावा लागल्या आहे. त्यामुळे भारताचं फॉलोऑनचं गणित बिघडू शकतं.
सोनल दिनुषा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 137 चेंडूत नाबाद 85 धावांची खेळी केली. अजूनही मैदानात तग धरून असून चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारतीय संघापुढे आता फॉलोऑनचा पेच निर्माण झाला आहे. श्रीलंकेला फॉलोऑन द्यायचा तर 38 धावांच्या आत दोन्ही विकेट काढणं भाग आहे. अन्यथा भारताला फलंदाजीला यावं लागेल. पण 38 धावांचं गणित सोडवलं तरी भारताने फॉलोऑन द्यायचा की नाही हा देखील प्रश्न असणार आहे. भारताने पहिल्या डावात 503 धावा केल्या आणि डाव घोषित केला. तर श्रीलंकने 8 गडी 265 धावा केल्या असून 238 धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑन द्यायचा झाला तर भारताकडे किमान 200 धावांची आघाडी असणं भाग आहे.
Stumps!
Rain brings an end to Day 3 in Colombo 🌧️
Sri Lanka 265/8 in the first innings, trail by 238 runs
Scorecard ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/cc3dtY64ek
— BCCI (@BCCI) August 25, 2026
फॉलोऑनचा फायदा काय?
श्रीलंकेवर 200 धावांची आघाडी घेतली तर फॉलोऑन द्यायचा की नाही? असा प्रश्न आहे. कोलंबो कसोटीत पहिल्या दोन दिवसांत पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे पुढील दिवसांतही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जर भारताने स्वतः पुन्हा फलंदाजी करायचे ठरवले, तर त्यात महत्त्वाचा वेळ वाया जाईल. फॉलो-ऑन दिल्यास श्रीलंका लगेच दुसऱ्या डावात फलंदाजीला येईल आणि झटपट विकेट घेऊन जिंकण्याची संधी तयार होईल. तसेच तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला मदत करणारी दिसत आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना फॉलोऑन टाळताना फिरकीचा सामना करणं कठीण जाईल. श्रीलंकेचा पहिला डाव संपवण्यासाठी भारताला फार मोठी कसरत करावी लागलेली नाही. त्यामुळे गोलंदाजांना तसा थकवा नसेल.
