
गेल्या वर्षी मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार पहायला मिळाला होता. त्यामुळे या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. आता काही दिवसांनी राष्ट्रपती राजवट संपणार आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने मणिपूरमधील आपल्या सर्व आमदारांना तसेच एनडीएच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजपने 31 जानेवारी रोजी पक्षाच्या आमदारांना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राष्ट्रीय राजधानीत उपस्थित राहण्याबाबत आदेश जारी केला आहे. आजच काही आमदार दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पक्षाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल अशावेळी उचलले आहे, जेव्हा राज्यातील राष्ट्रपती राजवट संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या राज्यात फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे, विधानसभेचे कामकाज स्थगित आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवटीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा करण्यासाठी आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र या बैठकीत राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी यांनी आमदारांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. तसेच भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा यांनी आमदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आहे, आता 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपणार आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आता एका आठवड्यात मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकते. त्याच्यात तयारीसाठी भाजपने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. त्यामुळे आता मणिपूरमध्ये कधी सरकार स्थापन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.