महिन्याला घरभाडं द्यावं लागतं, आर्थिक परिस्थिती…, भाजपच्या बड्या नेत्यानं सोडला पक्ष, काँग्रेसमध्ये जायलाही तयार, पण एक अट…
दर महिन्याला घरभाडं द्यावं लागतं, घरमालक तेव्हा तुम्हाला हे विचारत नाही की, तुम्ही भाजपचे आहात की आणखी कोणत्या पक्षाचे? असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. तसेच काँग्रेस प्रवेशासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

भाजप नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. माझी आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे मला हे पाऊल उचलावं लागलं आहे, असं या मुलाखतीमध्ये शहजाद पुनावाला यांनी म्हटलं आहे. महिन्याच्या एक तारखेलाच घरमालकाला घर भाडं हवं असतं, तो हे म्हणत नाही की, तुम्ही भाजपचे आहात की अजून कोणत्या पक्षाचे. भाजपच काय जगातील कोणताही पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना सॅलरी देत नाही. त्यामुळे अशा स्थितीमध्ये पक्षासाठी 24 तास कार्य करणं शक्य नाही, असंही यावेळी पुनावाला यांनी म्हटलं आहे.
भाजप सोडण्याचं कारण काय?
शहजाद पूनावाला हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते, मात्र त्यांनी आता भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, एवढंच काय तर त्यांनी भाजपच्या प्राथमीक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. आता ही जबाबदारी मी सांभाळू शकत नाही, कारण आयुष्यात समोर जी परिस्थिती आहे, तिच्यापासून मी आता जास्त दिवस दूर राहू शकत नाही. माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी माझ्या आईची सेवा करू शकत नाहीये, तसेच माझी आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे मी भाजपचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांना पगार देणं हे भाजपच काय कोणत्याही पक्षाचं काम नाहीये, कारण तुम्हाला पक्षाचे विचार आवडतात, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काम करत असतात, असंही यावेळी पुनावाला यांनी म्हटलं आहे.
दरम्यान तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? असा सवालही यावेळी पुनावाला यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की मी काँग्रेसमध्ये जाईल, परंतु त्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे तुम्हाला त्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना हटवावं लागेल तसेच नेहरू यांनी ज्या काही चुका केल्या आहेत, त्याबद्दल माफी मागावी लागेल, असं पुनावाला यांनी म्हटलं आहे.