Brijbhushan Singh : राज ठाकरेंविरोधातला ट्रॅप भाजपचाच, बृजभूषण सिंहच्या कबुलीचा व्हिडीओ व्हायरल, राज्यातील भाजप नेते तोंडघशी?

| Updated on: May 23, 2022 | 12:47 PM

Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह हे गोरखपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही कबुली दिली. मी सहावेळा भाजपचा खासदार आहे. एक वेळा माझी बायको इथळी खासदार होती.

Brijbhushan Singh : राज ठाकरेंविरोधातला ट्रॅप भाजपचाच, बृजभूषण सिंहच्या कबुलीचा व्हिडीओ व्हायरल, राज्यातील भाजप नेते तोंडघशी?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार बृजभूषण सिंह
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोरखपूर: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan sharan singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour) जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येत यावं, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्येचा दौरा रद्द करावा लागला होता. तसेच आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा काहींचा प्रयत्न होता. त्यामुळेच हा दौरा रद्द करावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. पण राज ठाकरे यांनी कुणाचा नाव घेतलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही हा भाजपचा ट्रॅप असल्याचं सांगितलं. त्यावर भाजपने सावंत यांचा आरोप फेटाळून लावला. भाजपबद्दल बोलायला सावंत एवढे मोठे नाहीत असं भाजपने स्पष्ट केलं. मात्र, पक्षाच्या सांगण्यावरूनच मी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत आहे, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. बृजभूषण सिंह यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली असून राज ठाकरेंविरोधातील ट्रॅप भाजपचाच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

हे सुद्धा वाचा

बृजभूषण सिंह हे गोरखपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही कबुली दिली. मी सहावेळा भाजपचा खासदार आहे. एक वेळा माझी बायको इथळी खासदार होती. आम्ही सात वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहोत. आमच्या आंदोलनाला कोण मज्जाव करेल?, असं बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. राज ठाकरेंना तुम्ही पक्षाच्या सांगण्यावरून विरोध करत आहात का? असा सवाल केला असता मी पार्टीचंच काम करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेते तोंडघशी पडले आहेत.

राज ठाकरेंचं नेमकं विधान काय?

राज ठाकरे यांची काल पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं होतं. मी हट्टाने अयोध्येला गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक, हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे प्रचार करायला कोणीच नसतं. हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.

सचिन सावंत काय म्हणाले होते?

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज यांच्या आरोपानंतर थेट भाजपवर हल्ला चढवला होता. पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे? आपल्या खासदारावरच शंका घेणे ही गंभीर बाब आहे. भाजपाचा उत्तर भारतीयांसाठी कळवळाही खोटा दिसतो. “अयोध्या द ट्रॅप” या चित्रपटाचे कथानक भाजपानेच रचले व महाराष्ट्र भाजपनेच रसद पुरवली या मताशी आम्ही ठाम आहोत, असं सचिन सावंत म्हणाले होते.

चंद्रकांतदादांनी आरोप फेटाळला

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सावंत यांचा आरोप फेटाळला होता. राज ठाकरेना काय वाटतं ते त्यांनी सांगितलं. ते समर्थ आहेत. हा भाजपचा छुपा ट्रॅप आहे हे सांगण्याएवढे सचिन सावंत मोठे नाहीत, असं सांगतानाच बृजभूषण यांना थांबवण्यासाठी काय केलं हे ओपनली सांगता येणार नाही. बृजभूषण यांची भूमिका वैयक्तिक होती, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. तर भाजपच्याच सांगण्यावरून आंदोलन करत असल्याचं सांगून बृजभूषण यांनी चंद्रकांत पाटील यांना तोंडघशी पाडलं आहे.