Budget 2021 : ‘राहुल गांधींनी अर्थसंकल्प ना ऐकला ना वाचला’, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पलटवार

| Updated on: Feb 01, 2021 | 10:28 PM

संरक्षण मंत्रालयासाठी केलेल्या तरतुदीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारलाय. त्यावरुन आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार पलटवार केलाय.

Budget 2021 : राहुल गांधींनी अर्थसंकल्प ना ऐकला ना वाचला, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पलटवार
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी केलेल्या तरतुदीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारलाय. त्यावरुन आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार पलटवार केलाय. ‘राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प ना ऐकला ना वाचला,’ अशा शब्दात इराणी यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडलंय. ‘पंतप्रधान मोदी फोटोसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात, त्यांनी याच सैनिकांसाठी अर्थसंकल्पात निधी का वाढवला नाही?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.(Smriti Irani responds to Rahul Gandhi’s criticism of budget allocation for defense)

‘चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आणि आमचे अनेक सैनिक शहीद झाले. पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?’ असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

‘राहुल गांधींनी आपल्या परिवाराचा इतिहास जाणून घ्यावा’

राहुल गांधींच्या या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी गांधी परिवाराच्या इतिहासाकडे बोट केलंय. ‘राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प ना व्यवस्थित वाचला ना पाहिला. ते चीनची गोष्ट करत आहेत. कदाचित त्यांना त्यांच्या परिवाराचा इतिहास वाचण्याची गरज आहे की, चीनसोबत त्यांच्या परिवाराचे कसे घनिष्ट संबंध राहिलेले आहेत’, असं प्रत्युत्तर इराणी यांनी दिलं आहे.

‘पंतप्रधान मोदी जवानांना परिवार मानतात’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी सारखा आनंद आणि प्रकाशाचा सण सीमेवर जवानांसोबत साजरा करतात. त्यावेळी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ते जवानांना संदेश देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत. जवानांप्रती असलेली देशव्यापी भावना व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान सीमेवर जातात. अशा मुद्द्यावर जर राहुल गांधी राजकारण करत असली तर हे अगदीच बालिश राजकारण आहे. मला वाटतं की पंतप्रधान मोदींच्या या कृत्याचा सर्व देशवासीयांना अभिमान असेल”, असंही स्मृती इराणी म्हणाल्या.

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किती तरतूद?

2021-22 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी केलेली ही तरतूद मागील अर्थसंकल्पापेक्षा 7 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 71 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. यावर्षी संरक्षण खात्याला जो निधी मिळाला आहे त्यातून 3.38 लाख कोटी रुपये खर्चासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात पेन्शनचाही समावेश आहे. तर उरलेले 1.40 लाख कोटी रुपये योजनांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

सैन्य दलाच्या हिस्स्याला किती निधी?

2.12 लाख कोटी रुपये संरक्षण सेवांवरील खर्चासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात पगार, परिवहन, रिपेअर, री-फीट, एनसीसी आणि अन्य विभागांचा समावेश आहे. तर लष्कराला 1.48 कोटी, नौदलाला 23 हजार 360 कोटी आणि वायूसेनेला 30 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. तर ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्ड (OFB)ला 113 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. डीआरडीओसाठी 9 हजार कोटी रुपये मिळाले आहे. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने अर्थसंकल्पात 1.35 लाख कोटी रुपये तरतूद केली आङे. मागील वर्षी हा आकडा 1.13 लाख कोटी रुपये होता. या पार्श्वभूमीवर अन्य सर्व मंत्रालयांपेक्षा संरक्षण मंत्रालयासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2021 : अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद का नाही? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

Budget 2021 : संरक्षण क्षेत्रातील तरतूद 7 टक्क्यांनी वाढवली, वर्षभरात 4 लाख 78 कोटी रुपये खर्च होणार

Smriti Irani responds to Rahul Gandhi’s criticism of budget allocation for defense