गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आणखी 40 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

| Updated on: Jul 23, 2021 | 12:47 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता रेल्वेने 72 गाड्या सोडल्या आहेत. मात्र, कोकणात जाण्यासाठीचं आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने वेटिंग लिस्ट वाढली आहे. (Ganpati special trains)

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आणखी 40 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा
कोकण रेल्वे
Follow us on

नवी दिल्ली: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता रेल्वेने 72 गाड्या सोडल्या आहेत. मात्र, कोकणात जाण्यासाठीचं आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने वेटिंग लिस्ट वाढली आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी अधिकच्या 40 फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दानवे यांची नुकतीच भेट घेऊन गणेशोत्सवात कोकणासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याचा विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Central Railway to run more 40 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांनी आज नवी दिल्ली येथे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोकणातील पूर परिस्थिती आणि रेल्वे, तसेच मुंबईत दरवेळी निर्माण होणारी पूरपरिस्थिती आणि रेल्वेच्या दळणवळणावर होणारे परिणाम याबाबत चर्चा केली. याबाबत दानवे यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांची तातडीने आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. कोकणात रेल्वेची सेवा लवकरात लवकर सुरु झाल्यास चिपळूण, संगमनेर आणि तळकोकणात मदत कार्याला वेग येईल त्यामुळे रेल्वे तातडीने पूर्ववत करण्यासाठी काम करण्यात यावे याबाबत आवश्यक सूचना त्यांनी केल्या. तसेच मुंबई बाबतीतही कायमस्वरूपी उपाययोजना सूचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

गणेशोत्सवासाठी 112 गाड्या उपलब्ध होणार

दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने सोडलेल्या 72 गाड्या फुल झाल्यामुळे अधिकच्या गाड्यांची मागणी आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार अजून 40 गाड्या सोडण्याची घोषणा दानवे यांनी केली. त्यामुळे आता गणेशोत्सवासाठी 112 गाड्या उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यानंतरही जर प्रतिक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या लाढविण्यात येईल, असेही दानवे यांनी पत्रकार परिषदे घेऊन जाहीर केले आहे. कोकणवासीयांना तातडीने न्याय दिल्याबद्दल रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार शेलार यांनी आभार मानले आहेत.

कोविड नियमांचे पालन करा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता 72 रेल्वेच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, वेटिंग लिस्ट मोठी असल्याने कोकणवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकच्या 40 फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई-कोकणवासियांसाठी वेटिंग लिस्ट वाढली तर अधिकच्या ट्रेन देऊ. ट्रेनचा खोळंबा होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोना नियमांचं पालन करूनच प्रवास करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. (Central Railway to run more 40 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

 

संबंधित बातम्या:

बाप्पा पावला! गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

(Central Railway to run more 40 Ganpati special trains between Mumbai and Konkan)