दिल्लीत आज ओबीसी परिषद, लालू, शरद यादव येणार; भुजबळ राजधानीत शक्तीप्रदर्शन करणार?

| Updated on: Dec 21, 2021 | 2:02 PM

ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आता देशभरातील ओबीसींना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दिल्लीत आज ओबीसी परिषद, लालू, शरद यादव येणार; भुजबळ राजधानीत शक्तीप्रदर्शन करणार?
Chhagan Bhujbal
Follow us on

नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आता देशभरातील ओबीसींना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ओबीसींचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी भुजबळ यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भव्य ओबीसी परिषद होणार आहे. या परिषदेला देशातील बडे ओबीसी नेते हजर राहणार असून या परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ हे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने आज दिल्लीत ओबीसी आरक्षण परिषद पार पडणार आहे. या परिषदेला राजद नेते लालूप्रसाद यादव आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सध्या महाराष्ट्रासह देशात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेत मोठा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ओबीसींच्या जनगणनेवरही चर्चा

या परिषदेत ओबीसींची देशव्यापी जनगणना करण्याचीही मागणी उचलून धरली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मागणीसाठी रणनीती आखली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय देशभरातील ओबीसींना एकत्र करून देशात ओबीसींची ताकद निर्माण करण्यावरही या परिषदेत चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भुजबळांच्या गाठीभेटी

दरम्यान, मधल्या काळात भुजबळ दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यावेळी देशपातळीवर ओबीसींची एकजूट करण्यावरही चर्चा झाली होती. त्यानंतर भुजबळांनी आज दिल्लीत ओबीसी परिषद बोलावली आहे. त्यामुळे भुजबळ हे देशपातळीवर ओबीसींची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय आजच्या परिषदेतून ते शक्तीप्रदर्शनही करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढीलवर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यामुळे या परिषदेला समाजवादी पार्टीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या परिषदेनंतर देशातील ओबीसींच्या एकत्रिकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच आजच्या परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

 

संबंधित बातम्या:

लखीमपूर हिंसेप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, राऊतांचा इशारा; विरोधकांचा संसदेबाहेर लाँगमार्च

Nagar Panchayat Election: नगरपंचायतीची रणधुमाळी, खासदार आमदार ते मंत्री साऱ्यांचीच प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?

1 हजार कोटींच्या जमिनी घोटाळ्याचा आरोप, आता सुरेश धस म्हणतात, कोर्टात बघू!