पोलिसांनी CJP चे आंदोलन मोडून काढले, लाठीमार करीत जंतर-मंतर रिकामे केले..
दिल्ली पोलिसांनी कॉक्रोज जनता पार्टीने संसदेकडे कूच केल्यानंतर हे आंदोलन लाठीमार आणि बळाचा वापरत करीत मोडून काढले. जंतर मंतर येथील सर्व आंदोलकांवर लाठीमार करुन पोलिसांनी CJP चे व्यासपीठ रिकामे केले आहे.

CJP निदर्शकांनी चलो संसद असा नारा देत संसदेकडे कूच केल्याने दिल्ली पोलिसांनी जोरदार लाठीमार करीत हे आंदोलन मोडून काढले आहे. काल रात्रीपासूनच दिल्लीच्या जंतरमंतर स्थळावर आंदोलकांनी डेरा घातला होता. मात्र, सकाळी भाजपाचे मंत्री जे.पी.नड्डा स्वत: आंदोलकाच्या शिष्टमंडळाशी बोलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतरही अचानक आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून हे आंदोलन मोडून काढले. जंतरमंतर येथेही लाठीमार करुन सर्व आंदोलनावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन ते रिकामे करण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी दिल्ली जिल्ह्यात काल रात्री पासूनच BNSS चे कलम १६६ लागू (आधीचे सीआरपीसी कलम 144 ) केले होते. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनासाठी कोणतीही परवानगी नव्हती. सकाळी आंदोलन स्थळाजवळ सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी सुरु केलेले उपोषण कायम होते. त्यानंतर दुपारी मंत्री जे.पी.नड्डा यांनी शिष्ठमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.
दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी जंतरमंतर, पार्लेमेंट स्ट्रीट, सेंट्रल व्हीस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक स्थळावर थ्री-टियर सुरक्षा ग्रिड तयार करण्यात आले. यात दिल्ली पोलिस जवानांचे दोन घेरे आणि पॅरामिलिट्री फोर्सची एक घेरा याचा समावेश आहे. अशी तिहेरी सुरक्षा या ठिकाणी लागू करण्यात आली. कोणत्याही आपत्कालिन स्थितीचा निपटारा करण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीमची चोवीस तास स्टँडबाय ठेवण्यात आली. त्यानंतर नेते अभिजीत दीपके यांनी उपोषण मागे घेतले तरी संसदेच्या दिशेने मोर्चा निघाल्याने पोलिसांनी नंतर या भागातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केली आणि नंतर लाठीमार सुरु करण्यात आला.
बॅरिकेट्स तोडून पुढे चाल सुरु केल्याने…लाठीमार
आंदोलकांनी संसदेकडे जाणारे बॅरिकेट्स तोडून पुढे चाल सुरु केल्याने संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांशी पोलिसांची झटापट झाली. यावेळी लाठीमार केल्याने पोलिसांवरही आंदोलकांनी दगडफेक केली, त्यामुळे वातावरण स्फोटक झाले आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना उचलून व्हॅनमध्ये भरण्यास सुरुवात केली आणि जंतर मंतर आणि कॅनॉट प्लेसला रिकामे केले.