कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?
CJP Protest : अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी आंदोलनाला आणखी एक पाऊल पुढे नेण्याची घोषणा केली आहे. सीजेपीने शुक्रवारी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.

दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरी आहे. अशातच आता अभिजीत दिपके यांनी या विद्यार्थी आंदोलनाला आणखी एक पाऊल पुढे नेण्याची घोषणा केली आहे. सीजेपीने शुक्रवारी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये 24 जुलै रोजी देशभरातील विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता उद्या संपूर्ण भारतभर आंदोलन करण्यात येणार आहे.
24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीने 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. पक्षाने विद्यार्थी आणि युवकांना मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरण तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्याच्या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे.
पत्रक व्हायरल
कॉकरोच जनता पार्टीने या आंदोलनाची माहिती डिजिटल पत्रकाद्वारे (पॅम्प्लेट) शेअर केली आहे. हे पत्रक सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे. सीजेपीने नागरिकांना मोठ्या संख्येने शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होऊन एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. सीजेपीने प्रत्येक जिल्ह्यात एक दिवसासाठी शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. व्हायरल पत्रकावर Every District. One Day. One Demand. हा संदेश देण्यात आला आहे.
इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय…
सीजेपीने आंदोलनादरम्यान जमलेल्या लोकांसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्या सार्वजनिकपणे वाचून दाखवण्याचे आणि पोलिस कारवाईचा सामना करणाऱ्यांप्रती एकजूट व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. सीजेपीने सांगितले आहे की, आंदोलनाशी संबंधित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर , प्रचार साहित्य आणि निवेदन कसे असेल याचा नमुना वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पोस्टरच्या शेवटी “इन्कलाब जिंदाबाद” आणि “भारत माता की जय” या घोषणांसह देशभरातील नागरिकांना या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिजीत दिपके यांच्या आवाहनानंतर आता संपूर्ण देशातील लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.