महाराष्ट्रानंतर आता पंजाबमध्ये खळबळ! थेट मुख्यमंत्री देणार राजीनामा? पडद्यामागे…काहीतरी मोठं घडणार?
भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याआधी काँग्रेस पक्षाने त्यांच्या एक्स खात्यावर एक व्हिडीओ क्लीप पोस्ट केली होती. याच व्हिडीओ क्लीपच्या मदतीने श्री अकाल तख्त साहीबने भगवंत मान यांना गुरु-द्रोही तसेच पंथ विरोधी घोषित केलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.

Bhagwant Singh Resignation : सध्या पश्चिम बंगास, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या राज्यातील काही प्रमुख विरोधी आणि प्रादेशिक पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. दरम्यान, एकीकडे या पक्षफुटीची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे पंजाबच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. येथे आप पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री भगवंत मान हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे अकाल तख्तकडून करण्यात आलेल्या एका घोषणेनंतर पंजाबमधील राजकारण चांगलंच तापलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाबमधील अकाल तख्तने धार्मिक गैरवर्तनाच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्यानंतर तेथील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस पक्षाने भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी त्यांच्या एक्स खात्यावर आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चांगलंच घेरलं आहे. ‘श्री अकाल तख्त साहीबने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर जगभरातील शीख बांधवांमध्ये एक रोष आहे. या निर्णयानंतर भगवंत मान यांनी नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,’ अशी मागणी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केली. तसेच भगवंत मान जर राजीनामा देण्यास तयार नसतील तर अरविंद केजरीवाल हे स्वत: भगवंत मान यांचा राजीनामा घेणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अकाल तख्तने नेमकी काय घोषणा केली?
भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याआधी काँग्रेस पक्षाने त्यांच्या एक्स खात्यावर एक व्हिडीओ क्लीप पोस्ट केली होती. याच व्हिडीओ क्लीपच्या मदतीने श्री अकाल तख्त साहीबने भगवंत मान यांना गुरु-द्रोही तसेच पंथ विरोधी घोषित केलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार अकाल तख्तने शीख समुदायाने भगवंत मान यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, असे आवाहन केले आहे. भगवंत मान यांनी शिख गुरूंच्या चित्रांवर मद्य शिंपडले आहे, असा आरोप करण्यात येतोय. या आरोपानंतर श्री अकाल तख्तने भगवंत मान यांना धर्म दोषी ठरवले आहे, असा दावा काँग्रेसने केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.