Sonia Gandhi : विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन वापरल्याने सोनिया गांधींचा संताप, भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं

Sonia Gandhi : पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सर्वांनी पाहिलं. त्याचवेळी पोलीस सुद्धा आंदोलकांच्या हल्ल्यात जखमी झाले. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान आता पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे.

Sonia Gandhi : विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन वापरल्याने सोनिया गांधींचा संताप, भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं
Sonia Gandhi
| Updated on: Jul 24, 2026 | 10:07 AM

दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनात पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरु आहे. यात विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. सोमवारी हे विद्यार्थी संसदेच्या दिशेने निघाले होते. संसदेवर त्यांनी मोर्चा काढलेला. त्या शिवाय दोन दिवसांपूर्वी सुद्धा जंतर-मंतरवर हिंसाचार झाला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडपा झाल्या. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सर्वांनी पाहिलं. त्याचवेळी पोलीस सुद्धा आंदोलकांच्या हल्ल्यात जखमी झाले. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान आता पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या मुद्यावर भाजप नेते अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

“देशाने खूप निराशाजनक दृश्य पाहिली. युवकांविरोधात पॅलेट गनचा वापर करण्यात आला. पॅलेट गनच्या खूणा विद्यार्थ्यांच्या शरीरावर दिसल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच पॅलेट गनच्या वापराला परवानगी दिली याबद्दल तिळमात्र शंका नाही” अशा शब्दात सोनिया गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

सोनिया गांधी काय म्हणाल्या?

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर शिक्षण व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला. विद्यार्थी फक्त जबाबदारी निश्चित करण्याची आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणेची मागणी करत आहेत. पण सरकार त्यांच्यासोबत शत्रूसारखं वागत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत उभं राहण्याचं आवाहन केलं.

विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला

“आजच्या शिक्षण व्यवस्थेकडून विद्यार्थ्यांना अपेक्षा उरलेल्या नाहीत. ते निराश आहेत. विद्यार्थी आंदोलन आज दोन कारणांमुळे होत आहे. एक म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेवरुन विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. दुसरी गोष्ट मोदी सरकारचा अहंकार, जबाबदारी निश्चित करणं आणि सुधारणांची पावलं उचलण्याची मागणी फेटाळून लावली. विद्यार्थ्यांसोबत उभं राहण, त्यांच्या भविष्याचं रक्षण करणं प्रत्येक राजकीय पक्ष आणि समाजाची, नैतिक, राजकीय आणि संवैधानिक जबाबदारी आहे” असं सोनिया गांधी यांनी लेखात लिहिलं आहे.

 

Follow Us