Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?
2026 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. TVKने 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. तर DMKला 59 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या.

Thalapathy Vijay : अभिनेते विजय थलापती तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून हे राज्य देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर विजय यांनी 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त खासदारंचा विजय व्हावा यासाठी विजय आतापासूनच आपली रणनीती आखत आहेत. तामिळनाडूमध्ये विजय थलापती हे देशाचे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान थलापती यांचे नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात असतानाच आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसने नेमकी काय भूमिका घेतली?
काँग्रेसचे तामिळनाडूतील मंत्री एस. राजेश कुमार यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (TVK)ला थेट इशारा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून TVKने पाठिंबा दिला नाही, तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे कुमार यांनी म्हटले आहे. कन्याकुमारी येथे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजेश कुमार यांनी ही भूमिका मांडली. ते किल्लीयूर मतदारसंघाचे आमदार असून तामिळनाडूचे पर्यटन मंत्री आहेत. मी स्वत: आणि माझे मंत्रिमंडळातील सहकारी पी. विश्वनाथन हे दोघेही आपल्या पदांचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान म्हणजे TVKने राहुल गांधी यांच्या उमेदवारीला पाठिंबा न दिल्यास काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे.
दोन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडू
दरम्यान, TVKमधील काही आमदार आणि मंत्री विजय यांना 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा संभाव्य चेहरा म्हणून पुढे करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे टीव्हीकेचा हा प्रयत्न सुरू असतानाच 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. TVKने त्यांना पाठिंबा नाकारल्यास आम्ही दोन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडू. आमच्यासाठी पक्ष सर्वाधिक महत्त्वाचा आहे,” असे राजेश कुमार यांनी सांगितले आहे.
तामिळनाडूनत सध्या काँग्रेस सत्तेत
2026 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. TVKने 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. तर DMKला 59 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसने DMKसोबतची आघाडी सोडून TVKसोबत हातमिळवणी केली. ही युती करताना काँग्रेसने राजकारणात आघाड्या होणे आणि तुटणे स्वाभाविक असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती.