मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
ज्येष्ठ समाजसेवा अण्णा हजारे यांच्या आरोग्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोग्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. किडनीच्या तपासणीसाठी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अण्णा हजारे रुग्णालयात दाखल
प्रकृती खालावल्याने अण्णा हजारे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी राळेगण सिद्धीजवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होता. यावेळी त्यांची प्रकृती खालावल्याने, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
अण्णा संसर्ग आणि डिहायड्रेशनमुळे त्रस्त
तीव्र विषाणू संसर्ग आणि डिहायड्रेशनने त्रस्त असलेल्या अण्णा हजारे यांना प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. सध्या ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली असून डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची सविस्तर तपासणी करत असून, त्या निष्कर्षांनुसार पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आयसीयूमध्ये त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अण्णा हजारे हे राळेगण सिद्धीच्या विकासासाठी तसेच भ्रष्टाचारविरोधी आणि सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनांसाठी ते देशभरात परिचित आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे. डॉक्टरांच्या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत अण्णा हजारे?
अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक, गांधीवादी विचारवंत आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांचे मूळ नाव किसन बाबुराव हजारे असून त्यांचा जन्म 15 जून 1937 रोजी झाला. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी या गावात जलसंधारण, वृक्षारोपण, ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि सामाजिक सुधारणा यासाठी मोठे काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे राळेगणसिद्धी हे देशातील आदर्श गावांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले. सामाजिक आणि ग्रामीण विकासातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
