इंडिया आघाडीची पाळेमुळे आता घट्ट रोवण्याची चिन्हं, पडद्यामागील मोठी बातमी

इंडिया आघाडीच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांचं सत्र पार पडत आहे. या बैठकांमधून देशभरातील विरोधी पक्ष एकमेकांसोबत संपर्क वाढवत आहेत, एकमेकांशी समन्वय साधत आहेत. येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा या हेतून हे पक्ष समजुतदारपणाची भूमिका घेत आहेत. त्यासाठी हे पक्ष आता आपापसातील मतभेद दूर सारुन एकोप्याने सर्वसमावेशक निर्णय घेणार आहेत. यासाठी स्वत: काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार असल्याची मोठी बातमी सूत्रांनी दिली आहे.

इंडिया आघाडीची पाळेमुळे आता घट्ट रोवण्याची चिन्हं, पडद्यामागील मोठी बातमी
india Alliance
Chetan Patil | Updated on: Jan 02, 2024 | 5:51 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 2 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे जोरदार हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या पक्षांकडून आगामी काळात मैत्री धर्म कसा पाळता येईल, यासाठी मंथन सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विरोधक याबाबत जास्त आघाडीवर आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सध्या सर्वच पक्षांकडून सामंजस्याची भूमिका घेतली जात आहे. ही आघाडी जास्त घट्ट व्हावी यासाठी काँग्रेस देशभरातील सर्व आघाडीतील पक्षांशी जुळवून घ्यायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस प्रत्येक राज्यामध्ये त्या-त्या मतदारसंघाच्या प्रादेशिक मोठ्या पक्षासोबत जागावाटपाबाबत जुळवून घेण्यास तयार झाली आहे. त्यामुळे इंडिया आघाडी कदाचित आगामी काळात एनडीए पेक्षाही जास्त बलशाली होण्याची चिन्हं आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीतील घटक पक्षांची चर्चा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. काँग्रेस घटक पक्षांना सोबत घेताना मोठा भाऊ म्हणून काही राज्यात समजुतदारपणाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी अर्थात आप पक्षासोबत जागावाटप केलं जाणार आहे. काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत जागावाटप करताना जुळवून घेणार आहे. तसेच झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांच्या पक्षासोबत, बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तर केरळमध्ये डाव्यांसोबत काँग्रेस जुळवून घेण्याची शक्यता आहे.

मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद

इंडियात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु असताना मुंबईत वेगळं चित्र बघायला मिळत आहे. मुंबईत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यात वाद बघायला मिळताना दिसत आहे. संजय राऊत यांनी 23 जागांवर दावा केला आहे. तर काँग्रेसच्या निरुपम यांनी मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं आहे.

उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी फोनवर संभाषण

एकीकडे संजय राऊत आणि संजय निरुपम यांच्यात जागावाटपावरुन संघर्ष बघायला मिळत असताना एक दुसरी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी फोनवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपाबाबत आमचे मतभेद नाहीत, पण भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. तसेच भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशीदेखील भूमिका उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसोबत फोनवर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे लवकरच जागावाटपाबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Follow Us