Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन

| Updated on: Apr 14, 2021 | 11:29 PM

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचं म्हटलंय. सरकार सर्व राज्यांना कोरोना लस उपलब्ध करत असल्याचा दावाही डॉ. हर्षवर्धन यांनी केलाय.

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
Follow us on

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. महाराष्ट्रातही कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अशावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचं म्हटलंय. सरकार सर्व राज्यांना कोरोना लस उपलब्ध करत असल्याचा दावाही डॉ. हर्षवर्धन यांनी केलाय. (No shortage of corona vaccine in the country, Dr. Harshvardhan’s claim)

कोरोना लसीबरोबरच विविध राज्यांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असून, काळाबाजार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्याची माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिलीय. ज्या 7 कंपन्या रेमडेसिव्हीरचं उत्पादन करत होत्या, त्यांनी उप्तादन कमी गेल्यामुळे तुटवडा जाणवत होता. पण या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसंच रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

काळाबाजार करणाऱ्यांना इशारा

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI)ने रेमडेसिव्हीरचा काळाबाजाराबाबत आलेल्या कोणत्याही तक्रारीवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. जे लोक मुद्दाम रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण करत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी, असंही त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात कोरोना स्थिती चिंताजनक –

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 15 दिवस संचारबंदी आदेश लागू राहणार आहे. अशावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आज दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत 39 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 5 हजार 721 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 58 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 12 हजार 70 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Break The Chain Order Maharashtra: नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

कोरोना संकटातही चांगली बातमी! ही आयटी कंपनी यंदा कॅम्पसमधून 25 हजार नोकऱ्या देणार

No shortage of corona vaccine in the country, Dr. Harshvardhan’s claim