‘फडणवीस मुंबईतून लक्ष ठेवतायत; शरद पवार, गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही’

| Updated on: Mar 23, 2021 | 1:08 PM

राज्यात भ्रष्टाचार आणि दुराचार वाढला आहे. माणसं बदलली तरी वृत्ती बदलत नाही. | Girish Bapat

फडणवीस मुंबईतून लक्ष ठेवतायत; शरद पवार, गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे गिरीश बापट यांनी म्हटले.
Follow us on

नवी दिल्ली: शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माहिती कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते जमणार नाही. प्रसारमाध्यमं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल, असा दावा भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी केला. येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस मुंबईत बसून साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, असे गिरीश बापट यांनी सांगितले. (Girish Bapat take a dig at Sharad Pawar and Anil Deshmukh)

ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्यात भ्रष्टाचार आणि दुराचार वाढला आहे. माणसं बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे गिरीश बापट यांनी म्हटले. तसेच कोण कुठे होते यापेक्षा परमबीर सिंह यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हा मूळ मुद्दा असल्याचे बापट यांनी सांगितले.

‘अरविंद सावंतांनी संसदीय भाषाच वापरली पाहिजे’

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. यावर गिरीश बापट यांनी भाष्य केले. अरविंद सावंत यांनी सभागृहात असे वागू नये. सभागृहात संसदीय भाषाच वापरली पाहिजे. सभागृहात शिवसेना खासदारांना बोलायला वेळ मिळाला नाही, हा चुकीचा आरोप आहे. विनायक राऊत यांना वेळ मिळाला होता. मात्र, त्यांना दोन तास दिले तरी कमीच आहेत, असा टोलाही बापट यांनी लगावला.

अनिल देशमुख मुंबईतच क्वारंटाईन होते, कुणालाच भेटले नाही; नवाब मलिक यांचा दावा

गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरला होम क्वॉरंटाईन होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते नागपूरहून थेट मुंबईला आले होते. मुंबईत क्वॉरंटाईन असण्याच्या काळात ते कुणालाच भेटले नाहीत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होते. या काळात ते कुठेही गेले नाहीत. कुणालाही भेटले नाहीत. सह्याद्रीवरही गेले नाहीत. त्या काळात त्यांची कोणतीही मुव्हमेंट झाली नाही. फक्त रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात व्यायाम करायला जायचे एवढीच त्यांची मुव्हमेंट होती, असं मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ अहवालाची सीबीआय चौकशी करा; फडणवीस आज केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, त्यांचा अहवाल खोटा; नवाब मलिकांचा दावा

(Girish Bapat take a dig at Sharad Pawar and Anil Deshmukh)