तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल, ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

| Updated on: Oct 26, 2021 | 3:50 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दादरा नगर-हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. (devendra fadnavis reaction on drug raid case)

तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल, ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा
devendra fadnavis
Follow us on

दादरा नगर-हवेली: ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. तसेच या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत. त्यांची विश्वासहार्यता संपुष्टात आल्यास नंतर कोणताही साक्षीदार साक्षीसाठी परत येणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दादरा नगर-हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी यावर फार भाष्य करणार नाही.पण माझे मत आहे की, अधिकाऱ्यांना धमकी देणे हे बरोबर नाही. जे साक्षीदार त्यांची विश्वासहर्ता संपेल अशी कारवाई झाल्यास पुढे कोणी साक्ष देण्यास पुढे येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप लागले आहेत तर एनसीबीनेही त्याची चौकशी करावी, असं फडणवीस म्हणाले.

शिवसेनेचा संधीसाधूपणा

दादरा नगर हवेलीत शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेने ज्या प्रकारे उमेदवारी देऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा संधीसाधूपणा आहे. एका दु:खद घटनेचं राजकारण शिवसेना करत असून ते योग्य नाही. लोकांना ते आवडणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

मोदींनी भ्रष्टाचार बंद केला

ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवलं. गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली हे पहिलं काम मोदींनी केलं. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरीबांच्या खात्यात जातो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरं दिली जातील. महाराष्ट्रात 10 लाख घरं दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय. मोदींनी घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील 60 वर्षात दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाहीत. ते 7 वर्षात मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालायचा. तो मोदींनी बंद केला आणि गरीबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय.

राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले सिल्वासा आणि दादरा नगर हवेली कित्येक वर्षानंनतर स्वतंत्र झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना मी येथील प्रशासन कसं काम करतंय हे पाहण्यासाठी बोलवतोय. येथील लोकांना गुलांमासारखं वागवलं जातंय. लोक या सत्ताधीशांपेक्षा पोर्तुगीज बरे असं म्हणायला लागले आहेत. शिवसेना येथील लोकांच्या पाठिशी उभं राहणार आहे. मोहन डेलकर यांना न्याय मिळावा म्हणून दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीत उमदेवार दिला आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

‘समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत’, बॉलिवूडला बदनाम करण्याच्या आरोपावरुन क्रांती रेडकर पतीच्या पाठीशी

‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

(devendra fadnavis reaction on drug raid case)