कोण आहे तो दुर्दैवी उमेदवार जो विधानसभा निवडणुकीत केवळ १ मताने पराभूत झाला?
तामिळनाडूमध्ये, माजी डीएमके मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन हे तिरुप्पत्तूर मतदारसंघात टीव्हीकेचे सीनिवास सेतुपती यांच्याकडून एका मताने पराभूत झाले. या मतदारसंघात सुमारे २,००० लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत एक थरारक आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. डीएमके (DMK) चे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा केवळ एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी टीव्हीके (TVK)चे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी ८३,३७५ मते मिळवली, तर पीरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन ३० मतांनी आघाडीवर होते, मात्र अंतिम फेरीतील एका मताने पूर्ण समीकरणच बदलून टाकले.
या मतदारसंघातील आर. पलकुरीची पंचायतीच्या दोन हजारांहून अधिक मतदारांनी प्रशासकीय सीमा वादाचे निराकरण न झाल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला. पीरियाकरुप्पन हे डीएमकेचे मोठे नेते मानले जातात. २००६ पासून ते सलग चार वेळा तिरुप्पत्तूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. २०२१ मध्ये सत्ता आल्यानंतर त्यांना ग्रामविकास मंत्री करण्यात आले. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी मनुष्यबळ आणि मंदिर प्रशासन मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. शिवगंगा जिल्ह्यात पक्षाचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पीरियाकरुप्पन यांचा राजकीय प्रवास
पीरियाकरुप्पन यांनी डीएमकेच्या विद्यार्थी संघटनेपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी वाणिज्य आणि कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. या पराभवामुळे डीएमकेच्या गोटात निराशेचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक नेते याला स्थानिक मुद्दे आणि विरोधी पक्षांच्या एकत्रित रणनीतीचा परिणाम मानत आहेत. दुसरीकडे, टीव्हीकेचे समर्थक या विजयाला मोठ्या राजकीय बदलाचे संकेत मानत आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक होती. शेवटच्या एका मताच्या फरकाने संपूर्ण तमिळनाडूचे लक्ष या मतदारसंघाकडे वेधले गेले आहे.
पीरियाकरुप्पन यांनी अद्याप अधिकृतपणे आपला पराभव स्वीकारला आहे की नाही, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते, ते पक्षाच्या रणनीतीवर गांभीर्याने विचार करतील. हा निवडणूक निकाल सिद्ध करतो की लोकशाहीत प्रत्येक मत किती मौल्यवान असते. एका मताने केवळ एका मंत्र्याची जागा हिरावून घेतली नाही, तर संपूर्ण निवडणूक निकालाला एक नवीन वळण दिले आहे.