‘भारताकडे फक्त राष्ट्र म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून पहा’, IIT 2026 ग्लोबल कॉन्फरन्समध्ये सदगुरूंचे विधान

Sadguru : IIT2026 जागतिक परिषदेत सद्गुरूंनी अमेरिकेतली कॅलिफोर्नियातील लॉन्ग बीच येथे भाषण दिले. यावेळी त्यांनी 'भारताकडे एक राष्ट्र म्हणून पाहू नका, तर एक संस्कृती म्हणून पहा असे आवाहन केले.

भारताकडे फक्त राष्ट्र म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून पहा, IIT 2026 ग्लोबल कॉन्फरन्समध्ये सदगुरूंचे विधान
Sadguru Speech
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 25, 2026 | 5:41 PM

IIT च्या 75 वर्षांच्या उत्कृष्टतेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या IIT2026 जागतिक परिषदेत सद्गुरूंनी अमेरिकेतली कॅलिफोर्नियातील लॉन्ग बीच येथे 2,500 हून अधिक द्रष्टे, उद्योजक, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि बदल घडवणाऱ्या व्यक्तींना संबोधित केले. 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या परिषदेत इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी भारताकडे आधुनिक राष्ट्राच्या चौकटीपलीकडे पाहण्याचे आवाहन केले.

सद्गुरू म्हणाले की, ‘भारताकडे एक राष्ट्र म्हणून पाहू नका, तर एक संस्कृती म्हणून पाहा. एक संस्कृती म्हणून आपल्याकडे अनेक अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, ज्या जगात इतरत्र कुठेही नाहीत.’ सद्गुरूंनी भारताच्या दीर्घ सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख करताना सांगितले की, ‘भारताने बौद्धिक आणि वैज्ञानिक प्रगतीसोबतच जीवनाच्या अंतर्मुख पैलूंचा शोध घेण्याची परंपरा जपली आहे. भविष्यात अधिक सजग आणि संतुलित जग घडवण्यासाठी ही परंपरा आजही महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

जगात वेगाने होत असलेल्या बदलांबद्दल बोलताना सद्गुरूंनी सांगितले की, येणाऱ्या काही वर्षांत अनेक पिढ्यांमधील बदल फक्त काही वर्षांतच घडू शकतात. अशा परिस्थितीत मानसिक स्थैर्य आणि स्पष्टता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. माहिती आणि डेटा हाताळण्यात मशीन भविष्यात मानवांपेक्षा अधिक सक्षम ठरू शकतात. मात्र, मानवांनी माहिती प्रक्रियेपलीकडील बुद्धिमत्तेच्या नव्या पैलूंचा शोध घेणे आवश्यक आहे.

भाषणातील आणखी एका महत्त्वाच्या क्षणी त्यांनी सांगितले, ‘मानव शरीर ही या ग्रहावरील सर्वात महान आणि अत्यंत प्रगत तंत्रज्ञान प्रणाली आहे. या अंतर्गत तंत्रज्ञानाचा अधिक सखोल अभ्यास करण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि वेगवान बदलांच्या युगात मानवी कल्याण, स्पष्टता आणि क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

IIT2026 जागतिक परिषद ही परिषद 22 ते 25 एप्रिलदरम्यान लॉन्ग बीच कॉन्वेंशन सेंटर मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, भविष्यातील नवकल्पना, आरोग्य, शाश्वतता, गुंतवणूक आणि जागतिक सहकार्य यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. या परिषदेने भविष्योन्मुख नेतृत्वासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले, आणि सद्गुरूंच्या भाषणाने हे अधोरेखित केले की भविष्यातील दिशा केवळ तंत्रज्ञान ठरवणार नाही, तर ते वापरणाऱ्या मानवांची सजगता, संतुलन आणि विचारांची खोलीही तितकीच महत्त्वाची असेल.

 

 

Follow Us