सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याचा झाला गेम; पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून केली हत्या
Sarabjit Singh : पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली सरबजीत सिंग यांना तुरुंगात डांबले होते. लाहोरच्य कारागृहात ISI च्या इशाऱ्यावरुन त्यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या घडविणाऱ्यालाच पाकिस्तानमध्ये यमसदनाला पाठविण्यात आले आहे. त्याची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
हेरगिरीच्या नावाखाली कित्येकवर्षे भारतीय नागरीक सरबजीत सिंग यांचा आतोनात छळ करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI च्या इशाऱ्यावरुन लाहोर तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली होती. आता त्यांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. याविषयीचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. अमिर सरफराज असे या गुंडाचे नाव आहे. तो पण लाहोर तुरुंगात होता. सरबजीत सिंग यांना 1990 साली पाकिस्तानने हेरगिरीच्या नावाखाली अटक केली होती.
सरबजीत सिंग यांचा आतोनात छळ
पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सरबजीत सिंग यांना अटक केली होती. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. 1990 पासून ते पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात होते. त्यांच्या सुटकेसाठी मोठी आंदोलने झाली. भारत सरकारने त्यांच्यावरील आरोप फेटाळत, त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानकडे शिष्टाई केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 2013 मध्ये पाकिस्तानच्या लाहोर तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरुनच नामचीन गुंड अमीर सरफराजने ही हत्या केल्याचा आरोप होता.
भारतविरोधकांची डाळ पातळ
गेल्या दोन वर्षांपासून भारत विरोधकांची पाकिस्तानमध्ये खून होत आहे. यामध्ये आयएसआयच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अनेकांना रस्त्यावर, दुकानावर, अज्ञातांकडून टिपण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत दहशतवादी आणि भारताविरोधात गरळ ओकणाऱ्यांना आता पळता भूई थोडी झाली आहे. पाकिस्तानमधील नेत्यांनी या प्रकाराला कॉन्ट्रॅक्ट किलिंग, टार्गेट किलिंग असे नाव देऊन त्याचे खाप भारतावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
इतक्या जणांचा झाला खात्मा
अलजझीरा या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानुसार, गेल्या वर्षभरात 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये 6 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मुहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित, पाकिस्तान आर्मीशी संबंधित, पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेतील सदस्य यांना यमसदनाला पाठविण्यात आले आहे. या सगळ्यांनी भारताविरोधात कारवाया केलेल्या आहेत. अनेक जणांवर हल्ले झाले आहेत. त्यात काही जण मारल्या गेले तर काही जण वाचल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.