मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
मोठी बातमी समोर येत आहे. अखेर परीक्षा सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर हे बिल आता लोकसभेत सादर करण्यात आलं.

नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं. संसदेवर मोर्चा काढाण्यात आला, त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान या सर्व घडामोडी घडल्यानंतर आता लोसभेमध्ये सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं होतं. हे बिल लोसभेत मंजूर झालं आहे. दरम्यान हे बिल मंजूर झाल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित केलं आहे.
दीर्घ चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयकाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी या बिलाच्या मंजुरीसाठी आवाजी मतदान घेतलं. दरम्यान या बिलाला लोकसभेत मंजुरी मिळण्यापूर्वी कामकाजादरम्यान चांगलाच गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पहायला मिळालं. आज संसदेमध्ये बोलताना काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं त्या काळात पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी देखील चांगले आक्रमक झाल्याचं पाहयला मिळालं. राहुल गांधी यांनी पुरावे द्यावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी गृहमंत्रालयाच्या आदेशाची ऑर्डर दाखवावी अन्यथा त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी सत्ताधाऱ्यांनी केली, विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजुने चांगलाच गोंधळ झाल्यामुळे अखेर या काळात लोकसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान त्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा कामकाज सुरू झाल्यानंतर हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं. लोकसभेमध्ये आवाजी मतदाने परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकामध्ये परीक्षा फुटी सारख्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तींना कडक शिक्षची तसेच मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
