VIDEO : नशीबच फुटकं… शेतात 5 लाख रुपयाच्या नोटा गाडल्या, विसरून गेला, एक वर्षानंतर खड्डा खोदताच…
एका शेतकऱ्याने चोराच्या भीतीने ₹5 लाख शेतात गाडले, पण जागा विसरला. वर्षभरानंतर नांगरणी करताना नोटा सापडल्या, पण त्या पूर्णपणे खराब झाल्या होत्या. वाळवी लागून फाटल्याने बँकेने बदलण्यास नकार दिला. हातातून गेलेल्या पैशांमुळे त्याला मोठा धक्का बसला. ही राजस्थानमधील घटना आता देशभर चर्चेत आहे.

दैव देतं आणि कर्म नेतं अशी अवस्था एका शेतकऱ्याची झाली आहे. चोराच्या भीतीने त्याने आपल्या शेतात 5 लाख रुपयांच्या गड्ड्या लपवल्या. आता आपले पैसे सुरक्षित राहील असं त्याला वाटलं. त्यानंतर तो काही महिन्याने पैसे काढायला गेला, पण पैसे कुठे पुरून ठेवले ती जागाच विसरला. त्यामुळे त्याच्या काळजात धस्स झालं. चेहरा रडवेला झाला. पाच लाख रुपये हातचे गेल्याची चुटपूट मनाला लागली. काही काळाने तो या दु:खातून बाहेरही आला. साधारण एक वर्षानंतर शेत नांगरत असतानाच अचानक पैशाची थैली जमिनीतून वर आली आणि समोर नोटा बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण हा आनंदही अल्पकाळ राहिला. समोर जाऊन पाहिल्यावर त्या नोटा प्रचंड खराब झाल्या होत्या. काहीच कामाच्या राहिल्या नाहीत. नोटांची ही अवस्था पाहून त्याच्या काळजात अधिकच धस्स झालं. राजस्थानमधील या घटनेची आता देशभर चर्चा सुरू आहे.
राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाई गावातील ही घटना आहे. या गावातील मांगीलाल नावाच्या 50 वर्षीय शेतकऱ्याच्या नशिबी हा दैवाचा फेरा आला. एक वर्षापूर्वी त्याने गावात पक्क घर बांधण्यासाठी त्याचा प्लॉट विकला. त्याला प्लॉट विक्रीतून पाच लाख रुपये रोख रक्कम मिळाली होती. या पैशाची चोरी होऊ नये म्हणून त्याने पैशाची थैली शेतात गाडली. काही महिन्यानंतर तो पैसे काढायला गेला. पण तो जागाच विसरला. पैसे कुठे पुरून ठेवले हेच त्याला कळेनासे झाले. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्याने पैशाची आशाच सोडून दिली.
अन् झोपच उडाली
दोन दिवसांपूर्वी त्याने शेतात नांगरणीचे काम हाती घेतले. शुक्रवारी सकाळी जेव्हा तो पत्नी आणि मुलासोबत शेतात कामाला गेला, त्यावेळी त्याला शेतातील एका खड्ड्यात नोटांची थैली दिसली. थैली बाहेर काढल्यानंतर त्यांनी ती खोलून पाहिली आणि त्यांची झोपच उडाली. नोटांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. काही नोटांचा चुरा झाला होता. तर अनेक नोटा खराब झाल्या होत्या.
शेतीत सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटा होत्या. या नोटांना वाळवी लागली होती. बऱ्याच नोटा फाटून गेल्या होत्या. काही नोटांचे वाळवीमुळे दोन तुकडे झाले होते. काही नोटांवर सीरिअल नंबर स्पष्टपणे दिसत होते. या नोटा पाहून शेतकरी हवालदिल झाला होता. या नोटा कशा पद्धतीने बदलून घ्याव्यात हेच त्याला सुचेना.
बँकेत गेला, पण…
त्यानंतर मांगीलाल या सर्व खराब नोटा घेऊन पचपदरा येथील एसबीआय बँकेच्या शाखेत गेला. पण नोटांची स्थिती पाहून बँक कर्मचाऱ्यांनी बदलून देण्यास नकार दिला. त्यानंतर तो बालोतराच्या बँकेच्या मुख्य शाखेतही गेला. पण तिथेही त्याला कोणताच दिलासा मिळाला नाही.
ज्या नोटांचे सीरिअल नंबर स्पष्ट आहेत, त्या नोटा बदलण्यासाठी जयपूर जावं लागेल, असं बँक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. पण शेतकऱ्याच्या मते, तो अशिक्षित आहे. त्याची आर्थिक स्थितीही चांगली नाही. त्यामुळे जयपूरला जाऊन नोट बदण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेणे कठिण आहे.
तर नुकसान झालं नसतं
मांगीलाल याच्या बायकोच्या म्हणण्यानुसार, शेतात पैसे पुरल्याचं नवऱ्याने आधीच सांगितलं असतं तर कमीत कमी सुरक्षित पद्धतीने तरी ठेवले असते. एवढं मोठं नुकसान झालं नसतं.