Farmer Protest : महात्मा गांधी जयंतीपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु राहणार, राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 06, 2021 | 4:35 PM

गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

Farmer Protest : महात्मा गांधी जयंतीपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु राहणार, राकेश टिकैत यांची मोठी घोषणा
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.(farmers’ agitation on Ghazipur border will continue till October 2)

दिल्ली आणि उत्तर प्रदेशाची सीमा असलेल्या गाझीपूर सीमेवरील आंदोलनाचं नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. केंद्र सरकार तिनही कृषी कायदे रद्द करेल तेव्हाच आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. आता मात्र 2 ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

‘जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार’

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आणि सिमेंटच्या भिंती उभारुन खबरदारी घेतली होती. पण पोलिसांची ही खबरदारी केंद्र सरकारच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देश-विदेशातून मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठोकलेले खिळे अखेर पोलिसांना काढावे लागले. पण आता या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुलं लावणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज 72 वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी 2 ट्रक माती मागवल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘ग्रेटा थनबर्ग आणि रिहानाला ओळखत नाही’

ग्रेटा थनबर्ग आणि पॉपस्टार रिहाना यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत राकेश टिकैत यांनी केलं आहे. पण आपण या दोघींनाही ओळखत नसल्याचं टिकैत यांनी म्हटलंय. हे आंतरराष्ट्रीय कलाकार कोण आहेत? त्यांनी आमचं समर्थन केलं असलं तरी मी त्यांना ओळखत नाही, असं टिकैत यांनी पत्रकारांना सांगितलं.

संबंधित बातम्या :

मोदी शेतकरी आंदोलनावर संसदेत बोलणार? कधी बोलणार? भाजप खासदारांना व्हिप जारी

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

farmers’ agitation on Ghazipur border will continue till October 2