कर्ज चुकवायची नोटीस आली, तितक्यात आयुष्य बदलणारी लॉटरी लागली
याला म्हणतात नशीब, टेन्शन दूर, मच्छीमार झाला मालामाल

मुंबई: कधी कोणाचं नशीब, कसं पलटेल ते सांगता येत नाही. संकटात असताना काही जणांच्या बाबतीत चमत्कार घडतात. असाच चमत्कार केरळमधील मच्छीमार (Kerala Fisherman) पूकुंजूच्या बाबतीत घडला आहे. कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी बँकेकडून त्याला जप्तीची नोटीस (Bank notice) मिळाली होती. त्यामुळे पूकुंजू (Pookunju) तणावाखाली होता. पण त्याच्या नशिबात मात्र काही वेगळच लिहिलेलं होतं.
टेन्शन फक्त काही तासांच
पुकूंजूसाठी हे टेन्शन फक्त काही तासांच ठरलं. कारण त्याला केरळ राज्य सरकारची अक्षया लॉटरी लागली. पुकूंजूला या लॉटरीमधून तब्बल 70 लाख रुपये मिळणार आहेत.
किती लाखाचं कर्ज होतं?
पुकूंजूने 12 ऑक्टोबरला अक्षया लॉटरीची तिकीट काढली. त्यावर पहिलं बक्षिस 70 लाख रुपये होतं. पुकूंजू पेशाने मच्छीमार आहे. तो नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. दुपारी तो घरी परतला, तेव्हा बँकेकडून घरजप्तीची नोटीस आल्याच त्याला समजलं. तो कर्जाचे 9 लाख रुपयाची परतफेड करु शकला नाही, म्हणून त्याला ही नोटीस पाठवण्यात आली.
आता इतक्या साऱ्या पैशाचं काय करणार?
“बँकेची नोटीस आल्यानंतर आम्ही सर्व चिंतेमध्ये होतो. काय करायच ते आम्हाला समजत नव्हतं. संपत्ती विकायची का? असा प्रश्न आमच्यासमोर होता” पुकूंजूच्या पत्नीने हे सांगितलं.
पण पुकूंजूच्या नशिबात वेगळच काही लिहिलेलं होतं. नोटीस मिळाल्यानंतर काही तासांनी अक्षया लॉटरीचा विजेता क्रमांक जाहीर झाला. पुकूंजूला पहिलं बक्षिस मिळालं. काही तासांपूर्वी कर्जामध्ये असलेला हा माणूस लखपती बनला.
एवढ्या पैशांच काय करणार? त्याबद्दल पुकूंजूच्या पत्नीने सांगितलं की, “सर्वप्रथम आम्ही कर्जाची परतफेड करणार. त्यानंतर मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, हे सुनिश्चित करु”
