एका वर्षात 3 LPG सिलिंडर मोफत मिळणार, बँक खात्यात जमा होणार 3 हजार रुपये; गोव्यात भाजप सरकारची मोठी घोषणा
एका वर्षात 3 LPG सिलिंडर मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर बँक खात्यात 3 हजार रुपये जमा होणार आहे. गोव्यात भाजप सरकारने मोठी घोषणा केली आहे.

गोव्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सिलिंडरबाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. आता गोव्यात प्रत्येक वर्षांत तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या खात्यात 9 सप्टेंबरपासून 3000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 सप्टेंबरपासून अर्ज करावा लागेल. सिलिंडर आणि आर्थिक लाभासाठी या योजनेचे अर्ज पंचायत आणि आमदारांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणुकीच्या वेळी तीन सिलिंडर आणि आर्थिक लाभाबाबत घोषणा केली होती. यानुसार पात्र लाभार्थ्याच्या खात्यात 3000 जमा झाल्यावर तीन एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक पासबुक, आधार कार्ड, मतदानओळखपत्र या सर्व कागदपत्रांच्या प्रती जमा करणे आवश्यक ठरणार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ हा 2027 साली संपणार आहे. एकंदरीत विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघ्या 1 वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने 40 पैकी 27 जागा जिंकल्या होत्या. 27 जागांच्या जोरावर भाजपने गोव्यात सरकारची स्थापना केली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं की, येत्या 9 सप्टेंबरपासून लाभार्थ्यांना बँक खात्यात 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. या आर्थिक लाभामुळे पात्र लाभार्थी व्यक्ती हा एलपीजी सिलिंडरची खरेदी करू शकतो’. मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे सांगितले की, ‘योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने अर्जासहित आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करावी. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा होतील. अर्जासहित बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्राच्या प्रत आवश्यक असणार आहे. सर्व आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर पात्र लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात होईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घोषणेने गोव्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.