24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण..
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामध्येच आता सरकारकडून मोठी पाऊले उलचली जात आहेत. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये आंदोलन केले आहेत.

नीट परीक्षेमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त आता दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर त्याची धग देशभर पोहोचली आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरु आहेत. जंतर मंतरवर काल जमावाकडून थेट पोलिसांनाच टार्गेट करण्यात आले. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. आंदोलक आक्रमक होत आहेत. हिंसक वळण आंदोलनाला येताना दिसतंय. आंदोलक धर्मंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. या आंदोलनाची प्रचंड व्याप्ती वाढत आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीमधील सुधारणाच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. मात्र, सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यामागील काही मोठी कारणेही आहेत. धर्मेंद्र प्रधान गेल्या 12 वर्षांपासून सलग मंत्रिपदावर आहेत. विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, पण त्यांचा राजीनामा घेण्याच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेण्यास आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, 24 तासात सरकारने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यासाठी वेगवेगळे 4 प्रस्ताव पाठवले. प्रस्तावात त्यांनी सांगितले की, तुम्हाला हव्या त्यावेळी आणि हव्या त्या कालावधीमध्ये चर्चा करण्याची आम्ही विनंती करतो.
ही चर्चा आरोग्यमंत्री जे.पी नड्डा यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यालयात होऊ शकते. मात्र, सरकारचा प्रस्ताव आंदोलकांकडून नाकारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचेही जाहीर करत मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले.