गुना, मध्य प्रदेश – जंगलात मध्यरात्रीच्या सुमारास हरणाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांची पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन पोलीस मृत्यमुखी पडले आहेत. मध्यप्रदेशातील गुना परिसरात आरोनमध्ये शनिवारी रात्री ३ च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत शिकारी नौशाद नेवाती याचा मृत्यू झाला आहे. तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला गोळी लागली आहे. जखमी झाल्यानंतरही राजकुमार जाटव यांनी अनेक राऊंद बंदुकीतून फायर केले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, मुख्यमंत्री शिवराजसंह चौहान यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय बैठक बोलावली. घटनास्थळी उशिरा पोहचले म्हणून ग्वाल्हेरचे महानिरीक्षक अनिल शर्मा यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे.
या कारवाईत शहीद झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १–१ कोटी मोबदला देण्याची घोषणाही मध्य प्रदेश सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. या शिकाऱ्यांची ओळख पटली असून, त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस पाठवण्यात आले आहेत. पोलिसांना या प्रकरणात कारवाईसाठी फ्री हँड देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
सगा बारखेडाच्या दिशेने काही समाजकंटक जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांची नाकेबंदी करण्यासाठी ३ ते ४ पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. शहरोकच्या जंगलात बाईकवरुन हे शिकारी येत असल्याचे पोलिासंना दिसले. पोलिसांची नाकेबंदी पाहताच या शिकाऱ्यांनी थेट गोळीबारास सुरुवात केली, त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत तीन पोलीस मृत्युमुखी पडले, तर एक शिकारी ठार झाला.
या चकमकीत निरीक्षक राजकुमार जाटव, रक्षक नीरज भार्गव आणि संतराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शइकाऱ्यांकडून पाच हरणं आणि एका मोराचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. शहिदांची पार्थिवं अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी पाठवण्यात आली आहेत.
भारतात काळे हरीण राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सापडतात. राजस्थानचा बिश्णोई समाज या हरिणांची पूजा करतो. आंध्र प्रदेशाने काळ्या हरणाला राज्याच्या प्राण्याचा दर्जा दिलेला आहे. हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांत भगवान कृष्णाचा रथ हे हरीण ओढतानाचा उल्लेख आहे. करणी माता ही त्यांची संरक्षक असते, अशी धारणा आहे. या काळ्या हरणातील नर हे रंग बदलतात. मान्सूनमध्ये त्यांचा रंग काळा असतो, हिवाळ्यात तो रंग उतरण्यास सुरुवात होते.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाी करत १० संशयितांना अटक केली आहे. जवळपास १० पोलीस ठाण्यातील १०० पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी आहेत. पोलीस त्यांची कारवाी करणारच असे जिल्हाधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामेही तोडण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई होईल, असे आश्वासन मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले आहे. या शिकाऱ्यांवर अशी कारवाई करण्यात येईल, की यापुढे कुणी पोलिसांवर गोळीबार करण्याची हिंमत करणार नाही, असे नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था काय स्थितीला आली आहे, याचे हे उदाहरण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे.