मोठी बातमी! आम्ही 26 जुलैला जंतर-मंतरवरील आंदोलकांना चोपणार, हिंदुत्ववादी संघटनेची घोषणा
Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांना एका हिंदुत्ववादी संघटनेने मारहाण करण्याची धमकी दिली आहे. 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जंतर-मंतरवरील CJP समर्थकांना मारहाण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टी गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांना एका हिंदुत्ववादी संघटनेने मारहाण करण्याची धमकी दिली आहे. गाझियाबादमध्ये हिंदू रक्षा दल नावाची संघटना चालवणारे पिंकी चौधरी यांनी 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जंतर-मंतरवरील CJP समर्थकांना मारहाण करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पिंकी चौधरी हे नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता चौधरी यांनी सीजेपीच्या आंदोलकांवर भारताची बदनामी करणे, सनातन धर्म आणि भारतीय सैन्याविरोधात वक्तव्य करणे तसेच अश्लीलता पसरवणे असे आरोप केले आहेत. यासोबत त्यांनी 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांना चोपण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता 26 तारखेला दिल्लीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हिडिओद्वारे धमकी
पिंकी चौधरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही धमकी दिली. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ‘आपल्या देशाचे वातावरण बिघडवण्यासाठी जंतर-मंतरवर जमलेले लोक सनातनविरोधी आहेत. त्यांना असा एखादा मुद्दा हवा होता ज्याच्या माध्यमातून ते भारताची जगभर बदनामी करू शकतील. हा सनातन धर्मीयांचा देश आहे. तिथे काही मुली ज्या प्रकारची अश्लीलता पसरवत आहेत आणि ज्या भाषेचा वापर करत आहेत, ते चुकीचे आहे. आपल्या देशाच्या सैन्याविषयीही अत्यंत चुकीची वक्तव्ये करण्यात आली आहेत.’
खासदारालाही धमकी
पिंकी चौधरी यांनी पुढे म्हटले की, ‘जंतर-मंतरवरील आंदोलनात शरजील इमाम, उमर खालिद यांसारखे देशविरोधी विचारांचे लोक सहभागी आहेत. चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि आझाद समाज पक्षाचे नेते व खासदार चंद्रशेखर आझाद यांचाही उल्लेख करत त्यांनाही अप्रत्यक्ष धमकी दिली. चौधरी म्हणाले की, ‘चंद्रशेखर रावण स्वतःला मोठे समजत आहेत. त्यांचीही अक्कल ठिकाणावर आणण्याचे काम करू. भारताची जगात बदनामी होऊ देणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा विरोध करू.’