मल्लिकार्जुन खर्गेंचा वाढदिवस, दोन्ही घरांमध्ये 2.3 किलोमीटरच अंतर..काँग्रेस नेते मोदींच्या घरापर्यंत कसे पोहोचले? सिक्रेट प्लान उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले.

मल्लिकार्जुन खर्गेंचा वाढदिवस, दोन्ही घरांमध्ये 2.3 किलोमीटरच अंतर..काँग्रेस नेते मोदींच्या घरापर्यंत कसे पोहोचले? सिक्रेट प्लान उघड
Rahul Gandhi
| Updated on: Jul 22, 2026 | 9:28 AM

काँग्रेसने काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियकां गांधी आणि काँग्रेस नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. इतके सगळे काँग्रेस नेते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत कसे पोहोचले? त्यांना कोणीच कसं अडवलं नाही? याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने काय सिक्रेट स्ट्रॅटजी आखलेली त्याची माहिती आता समोर आली आहे. मंगळवारी काँग्रेसने एक अशी राजकीय खेळी केली जिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. प्रसारमाध्यमे किंवा सुरक्षा यंत्रणा, कोणालाच याची कल्पना नव्हती.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा 84 वा वाढदिवस होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आणि त्यानंतर पक्षाच्या संपूर्ण नेतृत्वाने अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘7, लोक कल्याण मार्ग’ येथील अधिकृत निवासस्थानाच्या दिशेने कूच केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. दुपारी जेव्हा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ‘१०, राजाजी मार्ग’ येथील निवासस्थानी पोहोचले, तेव्हा काँग्रेस अध्यक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठीच ते आले असावेत, असा सर्वांचाच समज झाला. मंगळवारी खर्गे ८४ वर्षांचे झाले.

काँग्रेसने हे आंदोलन अत्यंत गुप्तपणे केले

त्यानंतर काँग्रेस नेत्यांचा एक ताफा अचानक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाला. खर्गे यांचे निवासस्थान आणि पंतप्रधान यांचे निवासस्थान यांच्यातील अंतर साधारणपणे 2.3 किलोमीटर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने हे आंदोलन अत्यंत गुप्तपणे आयोजित केले होते. सुरुवातीला, संसदीय कामकाज तहकूब झाल्यानंतर विजय चौकापर्यंत मोर्चा काढण्याचा पक्षाचा विचार होता, परंतु ही योजना आधीच उघड झाली.

सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली

पोलिस आधीच बॅरिकेड्स लावून नेत्यांना अडवतील, अशी काँग्रेसला भीती वाटत होती. सर्व प्रमुख नेते एकत्र जमताच, ते पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेने निघाले. निवासस्थानी पोहोचून प्रतिकात्मक निदर्शन करणं हा काँग्रेसचा उद्देश होता. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना काही अंतरावरच अडवले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या निदर्शनांमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली.

तातडीने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करावी लागली

सोमवारी संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, मंगळवारी मध्य दिल्लीत आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर एखाद्या किल्ल्याप्रमाणे सुरक्षित करण्यात आला होता. असे असूनही, काँग्रेसच्या या गुप्त मोहिमेबाबत सुरक्षा यंत्रणांना पूर्वसूचना मिळाली नाही. जेव्हा नेत्यांचा ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाला, तेव्हा पोलिसांना तातडीने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करावी लागली.

Follow Us