धक्कादायक, डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस बहिणींचा मृत्यू का? आई-वडिलांची प्रकृती नाजूक
एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डोसा खाल्ल्यामुळे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. डोसा बनवण्यासाठी त्यांनी जवळच्या डेअरीमधून खीरु आणलं होतं.

डोसा हा एक अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. डोशाचे वेगवेगळे प्रकार असून लोक त्यावर ताव मारताना दिसतात. घराजवळच हॉटेल किंवा एखादी डोशाची गाडी असेल तर तुम्हाला तिथे हमखास गर्दी दिसेल. डोसा हा मूळचा दक्षिणेतला खाद्यपदार्थ पण आज सगळ्या देशात प्रसिद्ध आहे. डोसा म्हटलं की अनेकांना रहावत नाही. खाण्यासाठी लोक लगेच तुटून पडतात. पण याच डोशामुळे दोन लहान निरागस मुलींचा मृत्यू झाल्याच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आई-वडिलांची प्रकृती गंभीर आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील चांदखेडा भागात ही घटना घडली. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. डोशामुळेच हे घडल्याची अधिकृत पृष्टी अजून झालेली नाही.
1 एप्रिलच्या रात्री विमल यांनी घराजवळ असलेल्या आयओसी रोडवरील एका डेअरीमधून डोसा बनवण्यासाठी खीरु विकत घेतला. कुटुंबाने त्या रात्री डोसे खाल्ले. दुसऱ्यादिवशी पुन्हा त्याच खीरुन डोसे बनवले. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांना उल्ट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवावं लागलं. मृत मुलींचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांनी ही माहिती दिली. कुटुंबात विमल, त्यांची पत्नी भावना आणि दोन मुली यांनी हा डोसा खाल्लेला. उपचारादम्यान 4 एप्रिलला तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. 5 एप्रिलला चार वर्षाच्या मुलीने प्राण सोडले. आई-वडिलांची प्रकृती अजूनही नाजूक आहे.
..तेव्हाच मृत्यूचं खरं कारण समजेल
अहमदाबाद नगर पालिकेच्या खाद्य विभागाने तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित डेअरीमधून खीरुचे नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. फूड अधिकारी डॉक्टर तेजस शाह यांनी ही माहिती दिली. चांदखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम आणि एफएसएल रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजेल. सध्या डोसा खाल्ल्यामुळेच हे झालं असं म्हणं घाईच ठरेल असं पोलिसांनी सांगितलं.
डेअरी मालकाने काय सांगितलं?
डेअरी मालकाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं की, मी 100 किलोपेक्षा जास्त खीरु विकलं. पण अन्य कुठल्याही ग्राहकाने अशी तक्रार केली नाही. मी अन्य ग्राहकांशी सुद्धा संपर्क साधला. खीरुचा वापर करुन बनवलेले खाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना कुठलाही त्रास झाला नाही.