कलश यात्रेसाठी जल भरण्यासाठी चाललेल्या भाविकांचा ट्रॅक्टर नदीत कोसळला, अपघातात 20 हून अधिक भाविकांचा मृत्यू

कलश यात्रेसाठी नदीवर जल भरण्यासाठी सर्व भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून चालले होते. यावेळी गर्रा नदीवरील पुलावर येताच ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् एकच हाहाकार उडाला.

कलश यात्रेसाठी जल भरण्यासाठी चाललेल्या भाविकांचा ट्रॅक्टर नदीत कोसळला, अपघातात 20 हून अधिक भाविकांचा मृत्यू
भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 15, 2023 | 4:46 PM

शाहजहापूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे शनिवारी भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. पुलाचे रेलिंग तोडून ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पडली. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भाविक गर्रा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. शाहजहापूरच्या तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळील राता पुलावर हा अपघात झाला. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम अपघातस्थळी पोहोचली आहे. बचावकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ‘ज्या भक्तांचे प्राण गेले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत’, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटले आहे.

कलश यात्रेसाठी जल भरण्यासाठी चालले होते

रविवारपासून तिल्हार परिसरातील सुनौरा अजमतपूर गावात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी कलश यात्रा काढण्यात येणार होती. यासाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून महिला आणि पुरुष बिरसिंगपूर परिसरातील गर्रा नदीकडे निघाले होते. पुलावर येताच वेग जास्त असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन रेलिंग तोडून नदीत पडली. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 40 हून अधिक लोक प्रवास करत होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.